• माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

बेळगाव : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्थानिक तरुणांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी बेळगावमधील औद्योगिक विकासाला सरकारने सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून आवश्यक जमीन उपलब्ध करत औद्योगिक क्षेत्राला नवी गती देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सांबरा विमानतळावर शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. बेळगाव जिल्ह्यात अधिकाधिक उद्योग उभारणे ही काळाची गरज असून, त्यामुळे बेरोजगारीची समस्या कमी होण्यास आणि स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

उद्योगांसाठी जमिनीची कमतरता असल्याची वस्तुस्थिती मान्य करतानाच, शेतकऱ्यांच्या हिताला कोणताही धक्का न लावता त्यांच्याशी सामंजस्याने चर्चा करून भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देतानाच औद्योगिक विकासालाही चालना देणे, ही राज्य सरकारची संतुलित भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘गृहलक्ष्मी’ योजनेच्या यशाचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात या योजनेचे मोठे योगदान असून, केंद्रीय आयोगानेही या उपक्रमाचे कौतुक केल्याचा दावा त्यांनी केला.

बेळगाव ही कर्नाटकची दुसरी राजधानी असून सुवर्णसौधमुळे जिल्ह्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्ह्याची भौगोलिक रचना आणि अनुकूल हवामान उद्योगवाढीसाठी पोषक असल्याचे सांगत, मुख्यमंत्री उत्तर कर्नाटकच्या विकासावर विशेष भर देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच आगामी काळात बेळगाव जिल्ह्याला किमान आणखी दोन मंत्रिपदे मिळतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.