• अ. भा. म. पत्रकार परिषदेच्या ४४ व्या राष्ट्रीय अधिवेशनात राबविली मोहीम

उदगीर (जिल्हा लातूर) : महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नाचा खटला सर्वोच्च न्यायालयात 2004 पासून प्रलंबित आहे. या खटल्याची सुनावणी सलगपणे करून त्वरित निकाल द्यावा अशी विनंती सरन्यायाधीशांना निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे. यासाठी बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना सीमाभाग व महाराष्ट्रातून १ लाख सह्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. या निवेदनावर महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, दैनिक लोकमतचे समूह संपादक राजेंद्र दर्डा, आमदार रोहित पवार, उद्धव ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक यांनी तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या पत्रकारांनी सह्या करून या मोहिमेस पाठिंबा दिला.

लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन शनिवारपासून सुरू झाले. या अधिवेशनात बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे सह्यांची मोहीम राबविण्यात आली. कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबई, नागपूर, बीड, नांदेड, अहिल्यानगर, नाशिक, आदि भागाबरोबरच बिदर, जिल्ह्यातील भालकी, औराद या सीमा भागातील पत्रकार व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सह्या केल्या. पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर, उपाध्यक्ष सुहास हुद्दार, पत्रकार परिषद प्रतिनिधी शेखर पाटील, कार्यकारणी सदस्य शिवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सह्यांची ही मोहीम राबविण्यात येत आहे.