बेळगाव / प्रतिनिधी

दक्षिण भारत क्षेत्र मुख्यालयाच्यावतीने बेळगावच्या मद्रास रेजिमेंटल सेंटरतर्फे ‘शौर्य संपरव’ या कार्यक्रमाचा भाग म्हणून सशस्त्र दलातील माजी सैनिकांपर्यंत पोहोचण्यासाठी कारगिल हॉल, जेएल विंग, बेळगाव येथे आयोजित माजी सैनिकांसाठीच्या तक्रार निवारण मेळाव्याला (ईएसएम रॅली) आज शनिवारी उस्फूर्त प्रतिसाद लाभला.

सदर मेळाव्याचे अध्यक्षस्थान रेकॉर्ड्स विभागाचे प्रभारी आणि द मद्रास रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर कृष्णेंदु दास यांनी भूषवले. अध्यक्ष स्थानावरून त्यांनी उपस्थित बेळगाव, धारवाड, हुबळी, गदग आणि विजापूर (विजयपुरा) या जिल्ह्यांतील माजी सैनिकांना संबोधित केले.कमांडंट दास माजी सैनिक, वीर नारी आणि त्यांच्या आश्रितांचे विशेषतः सशस्त्र दलांमध्ये आणि संपूर्ण राष्ट्रासाठी सेवेत असताना दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानले.