बेळगाव : पराक्रमी असूनही क्रूरकर्मा असलेल्या रावणाने देव, यक्ष, गंधर्व आणि राक्षस यांच्या हातून वध न होण्याचा वर मिळवला होता. अति आत्मविश्वासाने त्याने यातून मनुष्याला वगळले होते. भगवंतांनी मनुष्यावतार घेऊन त्याचा नाश केला. रामजन्म म्हणजे अमंगलावर मांगल्याने, अभद्रावर भद्राने आणि काळोखावर प्रकाशाने मिळवलेल्या विजयाचा आरंभ होता असे प्रतिपादन ख्यातनाम प्रवचनकार आणि लेखक असलेल्या डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले. केळकर बागेतील श्रीराममंदिरात आज दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते.
दशरथाने केलेल्या अश्वमेध व पुत्रकामेष्टी यज्ञात सर्व वर्णांच्या लोकांना बोलावून मानसन्मान करा अशी वसिष्ठांची स्पष्ट आज्ञा रामायणात नमूद केली आहे. याचाच अर्थ यज्ञादिक धार्मिक समारोहात चारी वर्णांचे लोक निमंत्रित असत हे सहज लक्षात येते. दशरथाच्या राज्याचे एकूण वर्णन पाहता तत्कालीन समाज हा संस्कारसंपन्न, धर्मनिष्ठ, वैभवसंपन्न, सुखी, कर्तव्यपरायण आणि शीलसंपन्न असा असल्याचे दिसून येते, असे डॉ.शेवडे यांनी नमूद केले. पुढे रामजन्म, बालपण, विश्वामित्रांसमवेत त्यांचे जाणे या सर्व गोष्टीतील बारकावे आणि सहसा ठाऊक नसलेला कथाभाग त्यांनी आपल्या प्रभावी वाणीने विशद केला.







