बेळगाव : सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी सवलतीत विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची माहिती देण्यासाठी आज बुधवार दि. २९ एप्रिल रोजी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवाजी विद्यापीठातील प्रा.डॉ.सुभाष कोंबडे, डॉ.कविता वड्राळे, डॉ. हर्षवर्धन पंडित यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर मध्यवर्तीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर उपस्थित होते.
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरने सीमाभागातील ८६५ विद्यार्थ्यांसाठी २०२६-२७ नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेशाची संधी आणि फी सवलत जाहीर केली आहे. अनुदानित अभ्यासक्रमांसाठी पूर्ण ट्यूशन फी आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी २५% ट्यूशन फी माफ. जे विद्यार्थी वसतिगृहासाठी प्रवेश घेऊ इच्छितात त्यांच्याकरीता वसतिगृह फी सुद्धा माफ करण्यात आली आहे. प्रवेश परीक्षेसह अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ मे २०२६ आहे आणि परीक्षा १२ ते १५ मे २०२६ दरम्यान होईल.
थेट प्रवेश : प्रवेश परीक्षेविना अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ मे २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. विविध अभ्यासक्रमासह शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या संधी सुद्धा शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
एम.एस.डब्ल्यू. बी.ए , बी. कॉम, बी.एस्सी, एम.ए, एम. एस्सी, एम.कॉम, एम.सी.ए, बी.बी.ए, एम.बी.ए, बी.टेक, एम टेक, एम एस डब्ल्यू. आणि इतर विविध विषयात शिक्षण घ्यायचे असेल तर त्यांना ही सुवर्णसंधी आहे. सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा, प्रवेशशुल्क आणि वसतिगृहामध्ये सवलती असून त्याचा लाभ सीमावासियानी करून घ्यावा असे आवाहन शिवाजी विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले.
यावेळी युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर,दत्ता उघाडे, महेश जुवेकर, सूरज कुडूचकर, श्रीकांत कदम, संतोष कृष्णाचे, तुकेश पाटील, विजय जाधव, वासू सामजी, सुहास हुद्दार,किरण हुद्दार, उमेश पाटील, साईनाथ शिरोडकर,सूरज चव्हाण विद्यार्थी -पालक उपस्थित होते. श्री शिवराज पाटील यांनी सूत्रसंचालन केले.








