• – डॉ. शेवडे यांचा सवाल

बेळगाव : वनवासाला जाण्याची आज्ञा फक्त श्रीरामांना झाली होती, सीतेला नव्हे ! त्यामुळे वसिष्ठांनी तिला राज्यावर बसण्याबद्दल सुचवले. ते म्हणाले की, तुझा राज्यशास्त्राचा अभ्यास मला माहिती आहे आणि त्यामुळे राम परत येईपर्यंत हे राज्य तू चालवावेस. याचा अर्थ त्याकाळच्या स्त्रिया वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेत होत्या, हे लक्षात येते. इतकेच नव्हे तर, अयोध्येमध्ये स्त्रियांसाठी वेगळी क्रीडाभवने असल्याचा स्पष्ट उल्लेख वाल्मिकी रामायणामध्ये मिळतो. असे असताना स्त्रियांना घरी ठेवण्याची पद्धत कधी चालू झाली याचा विचार करायला नको का? ज्यावेळी बाहेरील आक्रमक या देशावर चालून आले, त्यावेळी ते कोणत्याही वयाच्या स्त्रीला उचलून पळवून नेत होते आणि आपल्या जनानखान्यात भरती करत असत. तसे होऊ नये म्हणून कदाचित त्यावेळच्या समाजाने अशा भयंकरापेक्षा स्त्रीने घरातच राहावे असा विचार केला असेल तर तो विचार म्हणजे त्या वेळच्या समाजाची अगतिकता नव्हे नव्हती का? मग अशा अगतिकतेला आज आपण क्रौर्य हे नाव देणार का? असा मर्मभेदी सवाल आंतरराष्ट्रीय वक्ते, अभ्यासक व प्रवचनकार डॉ. शेवडे यांनी विचारला. केळकरबागेतील श्रीराम मंदिरात चाललेली रामकथेतील चवथे पुष्प त्यांनी गुंफले.

राम-सीता-लक्ष्मण यांच्या वनवास काळात सीतेने एकदा रामांना विचारले की, राक्षस आपल्या वाटेला जात नसतील तर आपण त्यांची हत्या करणे हे योग्य ठरेल का? तुम्ही एकदम तशी प्रतिज्ञा का घेतली? याचाच अर्थ असा की, एक स्त्री आपल्या पतीला सहजपणे असे प्रश्न विचारू शकत होती. त्यावर रामांनी तिला गप्प बसवले नाही, तर तिच्या प्रश्नांना विस्तृत उत्तर दिले. वनवास काळात रामांनी केलेले राक्षस वध, आलेली संकटे आणि विविध ऋषींच्या भेटी हे सर्व प्रसंग मांडताना डॉ. शेवडे यांनी इतिहास आणि सामाजिक गोष्टी यांचेही संदर्भ सांगितले.