- मध्यवर्ती बस स्थानकावर आंदोलन
- विश्रामगृह आणि स्वच्छतागृहांची मागणी रखडली
- बसमध्येच रात्र काढण्याची वेळ, परिवहन प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी
बेळगाव : बेळगावच्या मध्यवर्ती बस स्थानकावर जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या बस चालक आणि वाहतूक कर्मचाऱ्यांनी मूलभूत सुविधांच्या अभावाविरोधात आंदोलन छेडत परिवहन विभागाच्या प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. विश्रामगृह, स्वच्छतागृह आणि इतर आवश्यक सुविधांचा अभाव असल्याने बसमध्येच रात्र काढण्याची वेळ आल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला.
यादगीर, म्हैसूर, कलबुर्गी, बळ्ळारी, बसवकल्याणसह २० हून अधिक जिल्ह्यांतून कर्तव्यासाठी बेळगावात येणाऱ्या चालक आणि कर्मचाऱ्यांना विश्रांतीसाठी योग्य खोल्या, स्वच्छतागृह आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रोजच गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
सुमारे दीड वर्षांपासून परिवहन विभागाकडे सातत्याने मागणी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करत, बेळगावमध्ये बाहेरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र विश्रामगृहाची मागणी अद्यापही प्रलंबित असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
सुविधांच्या अभावामुळे अनेक कर्मचाऱ्यांना बसमध्येच विश्रांती घ्यावी लागत असून, डासांचा त्रास, उकाडा, पाऊस आणि अपुऱ्या सुविधांमुळे रात्रभर झोप न लागता दुसऱ्या दिवशी पुन्हा सेवेत रुजू व्हावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. या समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला.
“रात्रभर धावल्यानंतर बसला पुरेशी विश्रांती मिळाली नाही तर अपघाताची शक्यता वाढते. प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास जबाबदार कोण?” असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना विचारला.
परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे बेळगाव जिल्ह्याचे असूनही येथील कर्मचाऱ्यांना किमान सुविधा पुरवण्यात अपयशी ठरले आहेत, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
कर्मचाऱ्यांनी मागणी केली आहे की चालक आणि कमर्चाऱ्यांना विश्रामगृहे आणि शौचालये यांसारख्या आवश्यक पायाभूत सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यात याव्यात आणि एक सुरक्षित व मानवी कामाचे वातावरण निर्माण करण्यात यावे.








