पुणे : देशभरात मान्सूनच्या आगमनाबाबत उत्सुकता वाढत असताना यंदा नैऋत्य मोसमी वारे नियोजित वेळेत आणि अधिक वेगाने सक्रिय होत असल्याचे हवामान अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे. दक्षिण गोलार्धातील वातावरणीय घडामोडी तसेच हिंदी महासागर परिसरात निर्माण झालेल्या अनुकूल परिस्थितीमुळे मान्सूनच्या हालचालींना गती मिळत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

याच पार्श्वभूमीवर केरळ किनारपट्टीवर १ जूनच्या सुमारास मान्सून दाखल होण्याची शक्यता अधिक दृढ झाली आहे. ऑस्ट्रेलियातील हवामान विभागाने २०२५-२६ मधील उत्तर भागातील पावसाळी हंगाम समाप्त झाल्याचे जाहीर केल्यानंतर वातावरणीय प्रणालीत बदल दिसून येऊ लागले आहेत. या बदलांचा प्रभाव उत्तर गोलार्धातील हवामानावर होत असून भारतीय महासागर क्षेत्रात कमी दाबाची परिस्थिती तयार होत असल्याने मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे.

सध्या आंतरउष्ण कटिबंधीय अभिसरण पट्टा उत्तरेकडे सरकत असून तो मालदीवच्या उत्तरेकडून दक्षिण श्रीलंका आणि अंदमान-निकोबार बेटांपर्यंत विस्तारलेला आहे. मान्सून केरळ किनारपट्टीवर पोहोचण्यापूर्वी या पट्ट्यातील हालचाली महत्त्वपूर्ण मानल्या जातात. त्यामुळे येत्या काही दिवसांत मान्सूनच्या पुढील प्रवासाचे चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

  • दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा अंदाज

दरम्यान, हवामान विभागाने पुढील सात दिवस दक्षिण भारतातील विविध भागांत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तामिळनाडू, केरळ, पुदुचेरी आणि दक्षिण कर्नाटकात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच किनारी आंध्र प्रदेश आणि रायलसीमा भागात मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. लक्षद्वीप परिसरातही पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

दुसरीकडे, उत्तर-पश्चिम आणि पूर्व भारतातील काही भागांत उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज असून काही ठिकाणी अचानक वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपीट होण्याचाही इशारा देण्यात आला आहे. हवामानातील या बदलत्या परिस्थितीमुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.