- न्यायासाठी पीडित कुटुंबाची पोलीस आयुक्तांकडे धाव
बेळगाव : तालुक्यातील केदनूर गावात पाळीव कुत्र्याच्या मृत्यूला जबाबदार धरत एका वृद्ध दाम्पत्याला शेजाऱ्यांनी अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीत वृद्ध महिलेचा हात मोडला असून पीडित कुटुंबाने पोलीस आयुक्तांकडे न्यायाची मागणी केली आहे.
केदनूर गावातील कलेश्वर गल्ली येथे राहणारे भैरू रजई आणि शांता रजई यांना मारहाण करण्यात आली. शेजारी नंदू परशुराम लाड आणि सुगंधा लाड यांनी त्यांच्या पाळीव कुत्र्याच्या मृत्यूस वृद्ध दाम्पत्य जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांना मारहाण केल्याचे सांगितले जात आहे.
या मारहाणीत शांता रजई यांचा हात मोडला असून भैरू रजई हेही जखमी झाले आहेत. दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच नोकरीनिमित्त दुसऱ्या राज्यात असलेले त्यांचे मुलगे तातडीने गावी दाखल झाले. त्यांनी रुग्णालयात जाऊन आई-वडिलांची विचारपूस केली तसेच काकती ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
जखमी शांता रजई आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पोलीस आयुक्तांकडे धाव घेत आरोपींवर कठोर कारवाई करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.








