• महिनाभर प्रतीक्षा ; ई-जन्म विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
  • दलालांमार्फत दोन दिवसांत काम होत असल्याचा आरोप

बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या इ-जन्म नोंदणी विभागातील कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, जन्म-मृत्यू दाखले मिळवण्यासाठी सर्वसामान्यांना महिनाभर प्रतीक्षा करावी लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याउलट दलालांच्या माध्यमातून अर्ज केल्यास अवघ्या दोन दिवसांत दाखले मिळत असल्याचा गंभीर आरोप विरोधी नगरसेवक मुजम्मिल डोणी यांनी केला असून, या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

महापालिकेच्या इ-जन्म विभागात दाखल्यांसाठी अर्ज सादर करूनही २० ते २५ दिवस उलटून जात असतानाही अनेक अर्ज प्रलंबित राहत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात आली आहे. आवश्यक कागदपत्रे आणि रुग्णालयाकडील प्रमाणपत्रे सादर करूनही कर्मचाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात असून, नागरिकांना वारंवार महापालिकेच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याचे सांगण्यात आले.

यासंदर्भात तक्रारी वाढल्यानंतर नगरसेवक मुजम्मिल डोणी यांनी महापालिकेच्या इ-जन्म विभागाला भेट देऊन संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारला. वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी वेळेवर कार्यालयात उपस्थित राहत नसल्यामुळे नागरिकांना दररोज नवी कारणे सांगून परत पाठवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

बाळेकुंद्री, सांबरा यांसारख्या दूरच्या भागांतून येणाऱ्या नागरिकांसह ८२ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांनाही तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक जण रोजचे काम सोडून महापालिकेत हेलपाटे मारत असून, तातडीने दाखले मिळावेत यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

इ-जन्म विभागात किरकोळ दुरुस्तीसाठीदेखील नागरिकांना न्यायालयाचे फेरे मारण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप मुजम्मिल डोणी यांनी केला. लोकप्रतिनिधी किंवा सामाजिक कार्यकर्त्यांच्या विनंतीनंतरही कामे रखडत असताना, दलालांमार्फत आलेली प्रकरणे मात्र अल्पावधीत निकाली काढली जात असल्याचा आरोप त्यांनी पुन्हा केला.

कायद्याची अंमलबजावणी सर्वांसाठी समान असावी आणि महापालिकेतील दलालांचा हस्तक्षेप पूर्णपणे रोखण्यासाठी लवकरच महापौरांसोबत बैठक घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे नगरसेवक मुजम्मिल डोणी यांनी सांगितले. तसेच इ-जन्म विभागातील कामकाज अधिक पारदर्शक आणि वेळेत होण्यासाठी प्रशासनाने तातडीने सुधारणा कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.