रायचूर : राज्यातील मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना उधाण आले असतानाच मंत्री सतीश जारकीहोळी यांनी यावर प्रथमच स्पष्ट भूमिका मांडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना त्यांनी काँग्रेस सरकारचा कार्यकाळ पूर्ण होईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला.
रायचूर जिल्ह्यातील मुदगल येथे पत्रकारांशी बोलताना जारकीहोळी यांनी मंत्री डी. सुधाकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. सरकार तसेच वैद्यकीय तज्ज्ञांनी सर्व प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आले नाही, असे सांगत त्यांनी उद्या चल्लकेरे येथे होणाऱ्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार असल्याचे नमूद केले. सुधाकर यांचे राजकीय योगदान आणि अनुभव कायम स्मरणात राहतील, असेही त्यांनी म्हटले.
मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या चर्चेबाबत बोलताना जारकीहोळी म्हणाले, “कर्नाटकमधील आमचे सरकार पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ पार पाडेल. पक्षातील अंतर्गत मतभेद किंवा प्रश्न हायकमांडच्या स्तरावर सोडवले जातील. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितल्याप्रमाणे वरिष्ठ नेतृत्वाचा निर्णय अंतिम असेल.”
यावेळी त्यांनी आयपीएल अंतिम सामना स्थलांतराच्या मुद्द्यावरही भाष्य केले. तिकिटांच्या मागणीचे कारण पुढे करणे योग्य नसल्याचे सांगत, केवळ २२४ आमदारांसाठी सामना हलविणे शक्य नाही, असे त्यांनी नमूद केले. तसेच बीसीसीआय अध्यक्षांनी गुजरातला फायदा होईल या दृष्टीने अंतिम सामना अहमदाबादला हलवल्याचा आरोपही त्यांनी केला.








