खानापूर : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्यातील निट्टूर, यडोगा, तोपीनकट्टी, बिदरभावी, सन्नहोसूर, भंडरगाळी, निडगल आणि बरगाव या गावांतील मराठी प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
गेल्या नऊ वर्षांपासून युवा समितीच्या माध्यमातून सीमाभागातील मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण केले जात आहे. मराठी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि मराठी शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणे, हा उद्देश ठेवून हा उपक्रम राबविण्यात येतो. यावेळी विद्यार्थ्यांना अंकलिपी पुस्तिका, वह्या, पेन, पेन्सिल किट व इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

यडोगा येथे महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामचंद्र खांबले म्हणाले की मराठी शाळा जपल्या तर मराठी भाषा टिकणार आहे त्यामुळे सर्वांनी मिळून मराठी शाळा वाचविण्यासाठी कटिबद्ध राहिले पाहिजे.यावेळी श्री खांबले आणि उपस्थितांच्या हस्ते साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी शाळेचे शिक्षक पुंडलिक पाटील आणि इतर शिक्षकवर्ग उपस्थित होता.
निट्टूर येथे शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष संतोष चोपडे यांनी युवा समितीच्या उपक्रमाचे कौतुक केले तसेच मातृभाषेतून शिक्षणाचे महत्व सांगितले यावेळी सदस्य परशराम पाटील, बाळाप्पा नाईक, अमित नार्वेकर, महेंद्र नार्वेकर, शिक्षकवर्ग तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत साहित्याचे वितरण करण्यात आले.
मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मितेचे जतन करण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहून मराठी शाळा टिकविण्यासाठी प्रयत्नशील राहणे ही काळाची गरज आहे, असे युवा समितीचे सहकारी शुभम कांबळे यानी सर्व शाळांमध्ये उपक्रमाची माहिती देताना सांगितले.
तोपीनकट्टी, बिदरभावी, सन्नहोसूर, भंडरगाळी, निडगल आणि बरगाव येथील मराठी प्राथमिक शाळांमध्ये सुद्धा शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी युवा समिती खानापूरचे पदाधिकारी श्री पाटील, मुकेश गुरव, शुभम कांबळे, साईनाथ मळीक, प्रसन्न पाटील, कृष्णा खांबले, श्रेयस हल्ल्याळकर, चेतन हंगिणकेकर यांचे सहकार्य लाभले. यावेळी शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग आणि मराठीप्रेमी नागरिक उपस्थित होते.








