कागवाड : पर्यावरण संवर्धनाची काळाची गरज ओळखून येथील शिवानंद महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) यांच्यावतीने जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यामध्ये महाविद्यालय परिसर स्वच्छता, पर्यावरण जनजागृती फेरी आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी एनसीसी कॅडेट्सनी महाविद्यालय परिसराची स्वच्छता करून स्वच्छतेचा संदेश दिला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि प्लास्टिकमुक्ती याविषयी जनजागृती करणाऱ्या घोषणांसह परिसरातून फेरी काढली. या फेरीला विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी एनसीसी अधिकारी लेफ्टनंट अशोक आर. आलगोंडी यांनी उपस्थितांचे स्वागत करून जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व सांगितले. त्यांनी पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने वैयक्तिक स्तरावर जबाबदारी स्वीकारण्याची गरज व्यक्त केली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. तलवार यांच्याहस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “हवामान बदल, वाढते तापमान, अनियमित पाऊस आणि नैसर्गिक आपत्ती या समस्यांमागे मानवी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे ही केवळ शासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने दरवर्षी किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा.” त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहनही केले.

कार्यक्रमास डॉ. चंद्रशेखर वाय., एनएसएस कार्यक्रम अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनीही विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्य करण्याचे आवाहन केले. या उपक्रमात महाविद्यालयातील ५० हून अधिक एनसीसी कॅडेट्स व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याची शपथ घेतली. पर्यावरण संरक्षणाचा दृढ संदेश देणाऱ्या या उपक्रमामुळे महाविद्यालय परिसरात जागरूकतेचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एनसीसी अधिकारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. पर्यावरण रक्षणाचा संकल्प आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता झाली.