पुणे : जेष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली. विज्ञान आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये नारळीकरांनी उत्तुंग कामगिरी केली. नारळीकरांनी ११ जून १९६४ रोजी वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी गुरुत्वाकर्षणासंबंधीचा सिद्धान्त मांडला होता. त्यातूनच पुढे विश्वनिर्मितीच्या रहस्यावरील संशोधनाला चालना मिळाली. नारळीकर हे जागतिक ख्यातीचे शास्त्रज्ञ आणि मराठी विज्ञानकथेला आधुनिक चेहरा देणारे लेखक होते. ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती.

गुरुत्वाकर्षणासंबंधीचा सिद्धान्त मांडल्यानंतर एका रात्रीत नारळीकरांचे नाव घरोघरी पोहोचले होते. त्यावेळी ते स्वतंत्र भारतातील विज्ञानजगताचा चेहरा ठरले होते. त्यानंतर १९६५ मध्ये भारतदर्शन मोहीम काढत नारळीकरांनी ठिकठिकाणी व्याख्याने दिली होती. सरकारकडूनही नारळीकरांची दखल घेण्यात आली होती. १९६५ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यावेळी ते २७ वर्षांचे होते. पुढे २००४ मध्ये त्यांना ‘पद्मविभूषण’ सन्मानही मिळाला. २०१० मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

नारळीकरांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापुरात झाला होता. त्यांचे वडील विष्णू नारळीकर हे प्रसिद्ध गणितज्ञ आणि वाराणसी इथल्या हिंदू विद्यापिठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसीमध्येच झाले. १९५७ मध्ये त्यांनी विज्ञानात पदवी प्राप्त केली होती. या परीक्षेत त्यांनी पहिला क्रमांक पटकावला होता. त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी केंब्रिजला गेले.

नारळीकर यांचे चार दशकांहून अधिक काळापासून खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू होते. त्याचसोबत ते पुस्तके ही लिहित होते. सर्वसामान्य माणसाला खगोलशास्त्रज्ञ समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्न केले आहेत. त्यांच्या ‘यक्षांची देणगी’ या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता. ‘अंतराळातील भस्मासूर’, ‘अभयारण्य’, ‘अंतराळातील स्फोट’, ‘टाइम मशीनची किमया’, ‘प्रेषित’ अशी अनेक विज्ञानकथांची पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. दररोजच्या संशोधनाच्या कामातून विरंगुळा मिळावा, सामान्य वाचकाला वैज्ञानिक विश्वातील एखादा थरारक अनुभव द्यावा, विज्ञानाचं महत्व आणि वैज्ञानिक दृष्टीकोन समाजाला मिळावा म्हणून ते विज्ञानकथा लिहित असत. त्यांच्या पुस्तकांची विविध भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. त्याचप्रमाणे विविध मराठी नियतकालिकांमधून नारळीकर यांचे विज्ञानविषयक ललित लेखन सातत्याने प्रसिद्ध होत असत.