- मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर वन विभागाचा निर्णय
- आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा
बेळगाव : पश्चिम घाट परिसरात आणि खानापूर तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धबधबे, नदी-नाले आणि जंगल परिसर अत्यंत धोकादायक बनले आहेत. पर्यटकांच्या सुरक्षिततेचा विचार करून पश्चिम घाटातील धबधबे आणि वनक्षेत्रात पर्यटकांच्या प्रवेशावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.
बेळगावचे उपअरण्यसंरक्षणाधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत असून, पाण्याची पातळी अचानक वाढण्याची शक्यता, घसरडे रस्ते आणि जंगलातील वाढलेला धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
वन विभागाने नागरिक आणि पर्यटकांना बंदी आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले असून, धबधबे आणि जंगल परिसरात जाणे टाळावे तसेच वन विभागाला सहकार्य करावे, असे सांगितले आहे. बंदी आदेशाचे उल्लंघन करून प्रतिबंधित भागात प्रवेश करणाऱ्यांविरुद्ध वन कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
खानापूर तालुक्यातील सुरला धबधबा, वज्रपोहा (जांबोटी) धबधबा, कणकुंबी परिसरातील धबधबे, भीमगड अभयारण्यातील नैसर्गिक धबधबे ही पावसाळ्यात पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. तसेच भीमगड वन्यजीव अभयारण्य, कणकुंबी, जांबोटी, सुरला घाट, तिलारी बॅकवॉटर आणि म्हादई नदी परिसर येथेही दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. मात्र सध्याच्या अतिवृष्टीमुळे हे सर्व परिसर धोकादायक बनले असून, पुढील आदेश येईपर्यंत पर्यटकांनी या ठिकाणी जाणे टाळावे, असे वन विभागाने स्पष्ट केले आहे.



