- साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे ; शब्दगंध कवी मंडळ संघाचे आवाहन
बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या वतीने ‘गंध मातीचा’ हा कवयित्री सौ. स्मिता दीपक किल्लेकर यांच्या कवितांचा विशेष कार्यक्रम तसेच उपस्थितांचे खुल्या काव्यसंमेलनाचे आयोजन शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता मराठी विद्यानिकेतन, ज्योती महाविद्यालय कॅम्पस, बेळगाव येथे करण्यात आले आहे.
सौ. स्मिता किल्लेकर या गेली अनेक वर्षे सातत्याने मराठी साहित्य क्षेत्रात कार्यरत असून कविता, कथा, ललित लेख, प्रवासवर्णन आदी विविध साहित्यप्रकारांत त्यांचे लेखन प्रकाशित झाले आहे. सकाळ, तरुण भारत, पुढारी यांसह अनेक दैनिके तसेच विविध दिवाळी अंकांत त्यांच्या साहित्यकृती प्रसिद्ध झाल्या आहेत. बेळगावच्या साहित्य-सांस्कृतिक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग असून, शब्दगंध कवी मंडळ संघाच्या माजी सचिव म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. दिल्ली येथे भरलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘कवी कट्टा’ या निमंत्रित व्यासपीठावर त्यांनी कवितांचे सादरीकरण केले आहे. विविध काव्य, निबंध व ओवी स्पर्धांमध्ये त्यांनी अनेक पुरस्कार प्राप्त केले असून सध्या त्या मंथन कल्चरल अँड सोशल वेल्फेअर सोसायटीच्या सचिव म्हणून कार्यरत आहेत.
या कार्यक्रमात कवयित्रींच्या संवेदनशील, जीवनस्पर्शी आणि मातीतल्या सुगंधाने नटलेल्या कवितांचा आस्वाद घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. त्यानंतर उपस्थित कवींसाठी खुले काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.
या साहित्यिक मेळाव्यास सर्व साहित्यप्रेमी, कवी, रसिक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगावचे अध्यक्ष प्रा. अशोक आलगोंडी व सचिव श्री. सुधाकर गावडे यांनी केले आहे.








