- शेतकऱ्यांचा विरोध कायम
बेळगाव / प्रतिनिधी
हलगा–मच्छे बायपासच्या कामाला पुन्हा गती देण्यात आली असून अनगोळ शिवारात मंगळवारपासून रस्ता सपाटीकरणाचे काम सुरू झाले आहे. मात्र, या कामाला सुरुवातीपासून विरोध करणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा नाराजी व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की बायपासचा मार्ग सुपीक जमिनीतून नेला जात आहे. हा रस्ता पडीक जमिनीतून करावा अशी त्यांची मागणी अनेक वर्षांपासून आहे. यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली, परंतु तरीही काम दडपशाहीने सुरू ठेवले जात असल्याचा आरोप ते करत आहेत.
रस्त्याबाबतचे नोटिफिकेशन आणि प्रत्यक्षात होत असलेला मार्ग यामध्ये तफावत असल्याचाही शेतकरी आरोप करतात. झिरो पॉईंटबाबत न्यायालयाने स्पष्ट आदेश दिल्यानंतरही महामार्ग प्राधिकरणाने अलारवाड क्रॉसला झिरो पॉईंट दाखवून दिशाभूल केली, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
न्यायालयीन लढा, खर्च आणि वेळ यामुळे अनेक शेतकरी हतबल झाले असून काहींनी नुकसानभरपाई स्वीकारली आहे. मात्र, काही शेतकऱ्यांचा खटला अद्यापही न्यायालयात प्रलंबित आहे. असे असतानाही पुन्हा युद्धपातळीवर काम सुरू झाल्याने शेतकऱ्यांचा संताप वाढला आहे.
सध्या अनगोळ परिसरात माती टाकून रस्ता सपाटीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याची तयारी कंत्राटदाराने केली असून पुढील काही दिवसांत काम आणखी गती घेणार आहे.








