• “माय मराठीचा जागर हीच खरी सांस्कृतिक सेवा” ; जयंत पाटील यांचे गौरवोद्गार

बेळगाव : महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील यांना ७ वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन २०२६ ची निमंत्रण पत्रिका नुकतीच परिषदेच्या शिष्टमंडळातर्फे प्रदान करण्यात आली.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगावचे राज्याध्यक्ष रवींद्र पाटील आणि जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण यांनी आपल्या सहकाऱ्यांसह जयंत पाटील यांची भेट घेऊन संमेलनाचे निमंत्रण दिले. यावेळी मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या जतनासाठी सुरू असलेल्या परिषदेच्या कार्याची माहितीही देण्यात आली.
निमंत्रण स्वीकारताना जयंत पाटील यांनी संमेलनास शुभेच्छा देताना सांगितले की, “संमेलनाच्या माध्यमातून माय मराठीचा जागर घडविण्याचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्य जपण्यासाठी अशी चळवळ सातत्याने पुढे जाणे ही काळाची गरज आहे.”

यावेळी परिषदेचे उपाध्यक्ष डी. बी. पाटील, एम. वाय. घाडी, मोहन अष्टेकर, संजय मोरे, संजय गौंडाडकर, रणजित चौगुले, मोहन पाटील व गणेश दड्डीकर तसेच महिला कार्यकारिणीतील नेत्रा मेणसे, सविता वेसणे, रोशनी हुंद्रे, संजीवनी खंडागळे, स्मिता मेंडके, स्मिता किल्लेकर आणि गीता घाडी उपस्थित होत्या. मराठी अस्मितेचा जागर आणि साहित्यिक चळवळीला नवे बळ देणारे हे संमेलन येत्या २४ मे रोजी बेळगाव येथे संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक यशवंत पाटणे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडणार असून साहित्यप्रेमींमध्ये संमेलनाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.