अंकली : येथून श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींचा अश्व मोती व जरी पटक्याचा अश्व हिरा अशा या मानाच्या अश्वांच्या अंकली ते आळंदी अशा ३०० किमी प्रवासास सुरवात करण्यात आली.
अंकली येथील शितोळे घराण्याकडे १९४ वर्षापासून माऊलीच्या अश्वाची परंपरा आहे. या परंपरेनुसार आषाढी वारीसाठी शितोळे घराण्याचे मानाचे दोन्ही अश्व अंकली कडे प्रस्थान करतात. हैबतबाबा आरफळकर यांनी आषाढी वारीतील पालखी सोहळ्यास विशेष महत्त्व मिळवून दिले. यावेळी माऊलीच्या अश्वांचा व माऊलीच्या तंबूचा मान शितोळे घराण्याकडे आला. पिढ्या-दर-पिढ्या चालत आलेली परंपरा सध्या श्रीमंत ऊर्जितसिंह राजे शितोळे सरकार व त्यांचे पुत्र महादजीराजे शितोळे सरकार हे निष्ठेने चालवत आहेत.
अंकलीकर शितोळे सरकार यांच्या राजवाड्यात सकाळी १० वा. अंबाबाई मंदिरात पूजन व आरती करण्यात आली. जरीपटक्याचे पूजन करण्यात आले. दोन्ही अश्वांचे श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार व महादजी राजे शितोळे सरकार, विहानराजे शितोळे सरकार यांच्या उपस्थितीत चिकोडी सदलग्याचे आमदार गणेश हुक्केरी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. दिंडी व दोन्ही अश्व राजवाड्याबाहेर येताच भाविकांनी पाणी घालून ओवाळणी केली व दर्शन घेतले. गावातील पारंपारीक मार्गावरून ही मिरवणूक वेशीत आल्यानंतर अश्वांना निरोप देण्यात आला.
याप्रसंगी कापशीकर राणोजीराजे घोरपडे, राजाभाऊ थोरात पुणे, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख विक्रम महाराज मोरे, संत सेवक विलास तात्या बालवडकर,पुणे जिल्हा वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष निवृत्ती आबा कोळेकर, पुणे जिल्हा वारकरी सेवा संघाचे सचिव सौरभ शिंदे, संत ज्ञानेश्वर पादुका मंदिराचे विश्वस्त संदीप काळे, योगेश गोंधळे, योगेश आरू, बेळगावच्या मराठा संवर्धन संघटनेचे अनिल चौधरी, नितीन कपलेश्वरी, श्री बेरगी, शिवराज पाटील, बेळगावच्या राजश्री हलगेकर ज्ञानेश्वरी कार्लेकर यांच्यासह अश्वत शितोळे, रणजित शिरशेट, तुकाराम पाटील, पांडूरंग वड्डर तसेच अंकली, जुगूळ,चंदूर, मांजरीवाडी, काडापूर, परीसरातील वारकरी उपस्थित होते.अश्व चालक म्हणून तुकाराम कोळी, अक्षय परीट सेवा बजावणार आहेत.








