- येळ्ळूरच्या पायी दिंडीतील वारकरी महिलेचा हृदयविकाराने मृत्यू
येळ्ळूर : धर्मराज गल्ली येळ्ळूर येथील सौ. शालन प्रकाश सायनेकर (वय ५९) या सोमवार (ता. १३) रोजी येळ्ळूर येथून निघालेल्या वैष्णव सदन आश्रम येळ्ळूर ते पंढरपूर या पायी दिंडीतून चालत पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघाल्या होत्या. सोमवारपासून गुरुवारपर्यंत त्या अगदी व्यवस्थित दिंडीमध्ये चालत होत्या. गुरुवारी रात्री १. ३० वाजता अचानक त्यांना त्रास झाल्यामुळे दिंडीतील संचालकांनी त्यांना पहिल्यांदा चिक्कोडी येथील के. एल. ई रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी चिक्कोडी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचाराचा उपयोग न होता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या अचानक जाण्यामुळे वारकरी भक्तामध्ये व येळ्ळूर गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या मृत्यूने पांडुरंगाच्या भेटीची आस मात्र अधुरीच राहिली आहे.
पहिलीच वेळ या दिंडीतून त्या चालत प्रवास करीत होत्या. अन् दिंडीतच त्यांना मृत्यूने गाठले. त्यामुळे त्यांना मोक्ष मिळाला अशीही वारकऱ्यांतून चर्चा आहे. चिक्कोडी येथून त्यांचे पार्थिव आज सकाळीच येळळूर मध्ये त्यांच्या घरी आणण्यात आले आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन विवाहित मुली, एक विवाहित मुलगा, दिर,जावई व नातवंडे असा परिवार आहे. नवहिंद सोसायटीचे चेअरमन शिवाजी सायनेकर यांच्या त्या वहिनी होत. अंत्यसंस्कार आज शुक्रवार (दि. १७) रोजी सकाळी ११.०० वाजता फुटुक तलाव स्मशानभूमीत होणार आहे.








