मुंबई : आयपीएल २०२५ मधील ५८ वा सामना रद्द झाल्यानंतर ही स्पर्धा एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आली होती. एका नामांकित दैनिकाच्या बातमीनुसार, भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीनंतर परिस्थिती लवकरच सामान्य होईल. अशाप्रकारे ही स्पर्धा बुधवार किंवा गुरुवारी पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे. मायदेशी परतलेल्या परदेशी खेळाडूंना लवकरात लवकर त्यांच्या संबंधित आयपीएल फ्रँचायझींमध्ये सामील होण्यास सांगण्यात आले आहे. असे म्हटले जात आहे की, बीसीसीआयने फ्रँचायझींना मंगळवारपर्यंत अहवाल देण्यास सांगितले आहे. कारण त्यांना आयपीएल नियोजित तारखेला म्हणजेच २५ मे रोजी पूर्ण करायचे आहे.
कदाचित आणखी विलंब झाला तर अंतिम सामना ३० मे रोजी होण्याची शक्यता आहे. आयपीएल २०२५ मधील अजूनही १६ सामने शिल्लक आहेत. त्यामुळे बीसीसीआय अनेक डबल हेडरसह लीग पुन्हा सुरू करण्याची योजना आखत आहे. जर बीसीसीआयला देशभरात लीग आयोजित करण्यासाठी भारत सरकारकडून परवानगी मिळाली नाही. तर उर्वरित सामने बेंगळूरू, चेन्नई आणि हैदराबादमध्ये खेळवले जाऊ शकतात. आज बीसीसीआयची बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर सर्व संघांना सुधारित वेळापत्रक पाठवले जाईल.