बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून रसायनशास्त्राचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि केमिकल इंजिनीअरिंग विभागाचे डीन प्रा. प्रवीण घोरपडे उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. आर. के. पाटील, उपाध्यक्ष श्री. आर. एस. पाटील, सचिव श्री. नितीन घोरपडे आणि डी.एम.एस. सचिव विक्रम पाटील यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना संस्थेचे अध्यक्ष श्री. आर. के. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले की, “आजच्या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) च्या वेगवान युगात टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता, सतत नवनवीन गोष्टी शिकून स्वतःला अपडेट ठेवणे काळाची गरज आहे.” तंत्रज्ञानासोबत जुळवून घेत आपला अभ्यास अद्ययावत ठेवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाची सुरुवात भावपूर्ण ‘ज्योती दान’ सोहळ्याने झाली. दहावीच्या सर्व शिक्षकांनी दीपप्रज्वलन केले, त्यानंतर विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. स्वागत गीतानंतर श्रीमती सौदामिनी सावंत यांनी मुख्य अतिथींची ओळख करून दिली. विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती सोनाली कंग्राळकर यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले. मुख्य अतिथी प्रा. प्रवीण घोरपडे यांनी आपल्या भाषणातून स्वतःच्या करिअरचा प्रवास उलगडून दाखवत विद्यार्थ्यांना भविष्यासाठी प्रेरणा दिली. शाळेच्या वतीने प्रत्येक विद्यार्थ्याला प्रेमाची भेट म्हणून स्मृतीचिन्ह देण्यात आले. यावेळी काही विद्यार्थी आणि शिक्षकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी, वर्षभरातील आठवणींना उजाळा देणारी एक पीपीटी दाखवण्यात आली. मनोरंजक खेळांनी या कार्यक्रमाची सांगता झाली.








