विजयपूर / दिपक शिंत्रे
तब्बल १ कि.मी. लांबीचा तिरंगा ध्वज घेऊन हजारो युवकांची मिरवणूक, आकाशाला भिडणारे “जय जवान जय किसान”, “वीर जवान अमर रहें” या घोषणा… हे दृश्य “युवा भारत समिती”ने आयोजित केलेल्या तिरंगा यात्रेचे होते. या यात्रेचे आयोजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि भारतीय शूर जवानांच्या आरोग्य व आत्मविश्वास वृद्धीसाठी करण्यात आले होते.
श्री सिद्धेश्वर मंदिराजवळ एकत्र जमलेले शेकडो युवक शिस्तबद्ध पद्धतीने तिरंगा ध्वज घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले. भारतमातेच्या आणि वीर जवानांच्या प्रतिमा असलेली सजवलेली वाहनेही मिरवणुकीत सामील झाली. “भारत माता की जय”, “जय जवान जय किसान” अशा घोषणांनी संपूर्ण वातावरण राष्ट्रभक्तीने भारावून गेले.
युवक आणि युवतींनी भारताच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या समर्थनार्थ आपला सहभाग नोंदवला. “आमचे सैनिक दहशतवाद्यांविरुद्ध लढत आहेत, देव त्यांना अधिक शक्ती देवो,” असे ते म्हणाले. तिरंगा यात्रेची सुरुवात *श्री सिद्धेश्वर मंदिरापासून* झाली आणि ती महात्मा गांधी सर्कल व इतर मुख्य मार्गांवरून मार्गक्रमण करत डॉ. बी. आर. आंबेडकर सर्कल येथे संपन्न झाली.

तेथे झालेल्या सभेत रामकृष्ण आश्रमाचे श्री निर्भयानंद स्वामीजी यांनी बोलताना सांगितले की, “दहशतवादी राक्षसांप्रमाणे आहेत. त्यांनी निरपराध पर्यटकांवर केलेले हल्ले खूप वेदनादायक आहेत. त्यामुळे भारतातील तसेच परदेशातील भारतीय अस्वस्थ झाले आहेत.” स्वामीजी म्हणाले, आपले सैनिक पराक्रम व धैर्याचे प्रतीक आहेत आपल्याला सदैव सैनिकांच्या पाठीशी उभं राहावं लागेल. त्यांच्या सन्मानार्थ घेतलेली तिरंगा यात्रा अत्यंत अर्थपूर्ण आहे.”
युवा भारत समितीचे संस्थापक उमेश कारजोळ म्हणाले की, “क्रूर दहशतवाद्यांनी निरपराध पर्यटकांचे प्राण घेऊन विकृती दाखवली. संपूर्ण जग या घटनेमुळे हादरले. दहशतवाद्यांचा संहार व्हायलाच हवा.” भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंधूर अंतर्गत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून शत्रूंना चोख प्रत्युत्तर दिले आहे, असे सांगितले.
या कार्यक्रमात शरणय्य बांदरिमठ, बसवराज यादवाड, कुमार कट्टिमणी, बसवराज पत्तार, अनिल धनश्री, विरेश गोब्बूर, संतोष झळकी, शिवपुत्र पोपडी, कलमेश अमरावती, पूजा बागी, श्रीशैल मळजी आणि इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.