- पालकांना सापडले रक्ताने लिहिलेले पत्र
- शाळा प्रशासनावर पालकांचा संताप
विजयपूर / दिपक शिंत्रे
“आई-बाबा, शंभर वर्ष सुखाने जगा… माझी आठवण काढू नका… मी सुखात आहे” असे रक्ताने पत्र लिहिलेल्या विद्यार्थी संशयास्पदरित्या मृत अवस्थेत सापडल्याची खळबळजनक घटना विजयपूर जिल्ह्यातील ताळिकोट शहरातील एका खासगी शाळेत घडली आहे.
मात्र, त्या विद्यार्थ्याच्या पालकांनी हा खून असल्याचा आरोप करत शाळा प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. दुसरीकडे, शाळा प्रशासनाने त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले आहे. ही आत्महत्या आहे की खून, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, ताळिकोट येथील विनायक इंटरनॅशनल स्कूलच्या शेजारच्या मोकळ्या जमिनीतील झाडाखाली एका विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला. मडिवाळप्पा चबनूर (वय १५ रा. बोरगी ता. सिंदगी, जि. विजयपूर ) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो सध्या इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत होता. शाळा प्रशासनाने पोलिसांना मडिवाळप्पाने आत्महत्या केल्याची माहिती दिली आहे. परंतु, मृत विद्यार्थ्याचे पालक हा खून असल्याचा आरोप करीत आहेत. मृत विद्यार्थ्याच्या बॅगेतील नोटबुकच्या एका पानावर रक्ताने लिहिलेले पत्र सापडले आहे. त्यात “आई-बाबा… शंभर वर्ष सुखाने जगा… माझी आठवण काढू नका… मी सुखात आहे” असे लिहिल्याचे आढळून आले आहे. या पत्रामुळे विद्यार्थ्याच्या मृत्यू संदर्भात संशय निर्माण झाले आहे.
या घटनेबाबत शाळा कर्मचाऱ्यांनी सकाळी ७ वाजता पालकांना गोंधळलेल्या स्वरूपात माहिती दिली, असे मृताच्या पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांना या मृत्यूबाबत संशय निर्माण झाला आहे.घटनास्थळी ताळिकोट पोलिसांनी भेट देऊन तपास सुरू केला आहे. या प्रकरणी ताळिकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून विद्यार्थ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, घटनास्थळी पालकांचा आक्रोश हृदयद्रावक होता.एकूणच, या विद्यार्थ्याच्या मृत्यूबाबत पालकांनी शंका व्यक्त केल्या आहेत. शाळा प्रशासनाच्या दिलेल्या माहिती आणि रक्ताने लिहिलेल्या पत्रामुळे संशय अधिक गडद होत आहे. पोलीस तपासानंतरच या घटनेमागील खरे सत्य समोर येईल.








