- अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप ; चौकशी व कारवाईची मागणी
बेळगाव : बेळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयएएस अधिकारी मोहम्मद रोशन यांनी अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप करत खासदार धैर्यशील संभाजीराव माने यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
दरवर्षी १ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समिती व बेळगाव परिसरातील मराठी भाषिक नागरिकांकडून ‘काळा दिवस’ शांततेत पाळला जातो. १ नोव्हेंबर १९५६ रोजी भाषावार प्रांतरचनेनुसार बेळगावसह ६५४ मराठी भाषिक गावे महाराष्ट्रातून तोडून तत्कालीन म्हैसूर (सध्याचे कर्नाटक) राज्यात समाविष्ट करण्यात आल्याच्या निषेधार्थ हा दिवस पाळला जातो.
खासदार धैर्यशील माने हे लोकसभा सदस्य असून महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या महाराष्ट्र–कर्नाटक सीमावाद कायदेशीर तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष देखील आहेत. तक्रारीत त्यांनी नमूद केले आहे की, १ नोव्हेंबर २०२५ रोजी महाराष्ट्रातून कर्नाटक राज्यात जात असताना बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी तातडीने नोटीस बजावून पोलीस यंत्रणेमार्फत त्यांना सीमा ओलांडण्यापासून रोखले.
कोणताही गुन्हा दाखल नसताना तसेच कोणताही कायदेशीर आधार नसताना एका लोकप्रतिनिधीस एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यापासून रोखणे हे संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन असल्याचा ठपका खासदार माने यांनी ठेवला आहे. ही कारवाई म्हणजे अधिकारांचा स्पष्ट गैरवापर असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची गंभीर चौकशी करून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांविरोधात योग्य ती कारवाई करावी, अशी ठाम मागणी खासदार धैर्यशील माने यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे.








