- नदीकाठ शिवार परिसरात दुसऱ्यांदा लागवड केलेले भात रोपही पाण्याखाली : पुरामुळे शेती कशी करायची?
कंग्राळी बुद्रुक / वार्ताहर
कंग्राळी खुर्द, अलतगा गावाजवळून वाहणाऱ्या मार्कडेय नदीला यावर्षी तिसऱ्यांदा पूर आला असून यामुळे नदीकाठ शिवार परिसरात दुसऱ्यांदा लागवड केलेले भातरोप कुजून जाणार असल्यामुळे शेतकरीवर्गाला आपली जमीन ओस पडणार की काय? अशी चिंता भेडसावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यावर्षी मार्कंडेय नदीकाठ शिवार परिसरातील शेतकरी वर्गाला पुराच्या पाण्याचा सामना करतच रहावे लागत असून नदीकाठ परिसरातील शेती कशी करायची? अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
यावर्षी अवकाळी पावसापाठोपाठ रोहिणी, मृग, पुनर्वसु या तिन्ही नक्षत्रांनी अधिक पाऊस पाडल्यामुळे बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे राकसकोप धरणही पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आल्यामुळे नदीपात्रातील पाण्यात वाढ झाल्यामुळे तिसऱ्यांदा पूर येऊन मार्कंडेय नदीकाठ शिवारातील शेतकरीवर्गाने दुसऱ्यांदा केलेली भातरोपे परत कुजणार की काय अशी चिंता शेतकरी वर्गाला लागून आहे.
- हिरव्या चाऱ्याचीही टंचाई :
मार्कंडेय नदीला आता तिसऱ्यांदा पूर आल्यामुळे नदीकाठावर शिवार असलेल्या अनेक शेतकऱ्यांचे हिरवे गवत् सुद्धा पाण्याखाली जात असल्यामुळे तसेच पाण्याचा लाललेप गवतावर बसत असल्यामुळे जनावरांना हे गवत खाण्यालायक राहिलेले नाही. यामुळे सहजीकच नदीकाठावर गवत शेतकऱ्यांना हिरव्या चाऱ्याची टंचाई भासत असल्याचे दिसून येत आहे.
- शेतकऱ्यांचा ऊस पिकाकडे कल :
कंग्राळी खुर्द, कंग्राळी बुद्रुक, अलतगा, गौंडवाड, काकती परिसरातील मार्कंडेय नदीकाठ शिवार असलेल्या शेतकऱ्यांनी पुराच्या कटकटीला कंटाळून ऊस लागवडीकडे आपला मोर्चा वळविल्याचे चित्र दिसून येत आहे. भातरोप पुराच्या पाण्यामुळे कुजून जात असून जमिनी ओस पडत आहेत. ही कटकट कायमची दूर करण्यासाठी वरील परिसरातील मार्कंडेय नदीकाठ शिवार असलेल्या शेतकऱ्यांनी ऊस लागवडीकडे आपला मोर्चा वळविला आहे. त्यातच साखर कारखान्याकडून चांगला दर मिळत असल्यामुळे ऊस लागवडीकडे शेतकरीवर्ग वळला असल्याचेही चित्र दिसून येत आहे.