बेळगाव / प्रतिनिधी

किणये (ता. बेळगाव) येथे नरवीर तानाजी युवक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेत पुरुष व महिला गटात चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. पन्नास वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभलेल्या या स्पर्धेत पुरुष गटात बैलहोंगल संघाने प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावून आपले वर्चस्व सिद्ध केले, तर महिला गटात बेळवट्टी संघाने प्रथम क्रमांक मिळवला. बालिका आदर्श देसुर संघाने महिला गटात द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.

स्पर्धेचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते अशोक घागवे, सुवर्णकार राजू बेकवाडकर आणि डॉ. कृष्णा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारुती डुकरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांच्यासह सुरज जाधव, राजू पाटील आणि महेश डुकरे उपस्थित होते.

स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष गुरव सर, अनिल पाटील, कृष्णा पाटील, रामलिंग गुरव आणि शिवाजी पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. या कबड्डी स्पर्धेमुळे किणये परिसरात क्रीडाप्रेमींमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला.