खानापूर / प्रतिनिधी

कणकुंबी पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मलप्रभा नदीला पूर आलेला असून हब्बनहट्टी येथील श्री स्वयंभू मारुती मलप्रभा तीर्थक्षेत्र देवस्थानचे मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. तसेच देवाचीहट्टी हब्बनहट्टी दरम्यान असलेल्या मलप्रभा नदीवरील पूलावर पाणी आल्याने काही काळासाठी वाहतूक बंद झाली होती.तसेच तोराळी येथील ब्रिज कम बंधाऱ्यांच्या पूलालाही लागुन पाणी गेले.यावर्षी म्हणजे काल मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पहिल्यांदाच एवढा पूर आला आहे.

जांबोटी कणकुंबी भागात काल मंगळवार दि. २४ रोजी झालेल्या संततधार पावसामुळे या भागातील सर्व नदी वाले ओसंडून वाहत आहेत. त्याचबरोबर गेले आठ दिवस कणकुंबी भागात विजेचा लपंडाव असून भागातील काही गावे गेल्या दोन तीन दिवसापासून अंधारात आहेत. त्यामुळे कणकुंबी भागातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः बेळगाव चोर्ला गोवा रस्त्यापैकी कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील पूलाचे काम अर्धवट राहिल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक बैलूर व खानापूर मार्गे वळविण्यात आली आहे. याचा फटका देखील जांबोटी कणकुंबी भागात नागरिकांना सहन करावा लागत आहे.

सध्या होत असलेल्या मुसळधार पावसामुळे या परिसरातील सर्व धबधबे प्रवाहित झालेले असून वादळीवाऱ्यासह पावसाने आहाकार माजविला आहे.मे महिन्यात ५३१.८ तर जून महिन्यात अद्याप ११०० मि.मी.असा एकूण १६४० मि.मी.पाऊस कणकुंबी भागात झाला आहे.