- बीसीसीआयचा मोठा निर्णय
मुंबई : भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने सध्या सुरु असलेले आयपीएलचे उर्वरित सामने स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. आयपीएलचे एकूण १६ सामने शिल्लक होते. हे सामने आता नंतर खेळवण्यात येतील. मात्र हे सामने नक्की कधी खेळवण्यात येतील, याबाबत बीसीसीआयकडून माहिती देण्यात आलेली नाही.
पाकिस्तानकडून ८ तारखेच्या रात्री भारतावर ड्रोन हल्ले करण्यात आले. त्यामुळे धर्मशाला इथे सुरु असलेला पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा सामना मध्येच थांबवण्यात आला होता. त्यानंतर रात्रभर भारताची धडक कारवाई, पाकिस्तानकडून अधून मधून होणारे हल्ले, या पार्श्वभूमीवर आता बीसीसीआयकडून आयपीएलचे उर्वरित सामने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आयपीएलमध्ये एकूण ७४ सामने खेळवले जाणार आहेत. २२ मार्चपासून सुरु झालेल्या आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना २५ मे रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर खेळवण्याचे नियोजित होते. मात्र आता या सर्व स्पर्धेवर टांगती तलवार आहे.