बेळगाव : येळ्ळूर येथील दहा वर्ष जुन्या ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ फलक प्रकरणाचा निकाल अखेर निष्पाप ग्रामस्थांच्या बाजूने लागला आहे. फलक हटवल्यानंतर पोलिसांच्या अमानुष कारवाईतून सुरू झालेल्या सात खटल्यांमध्ये सर्व आरोपींना आज न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. या निर्णयामुळे दीर्घकाळ न्यायासाठी लढलेल्या ग्रामस्थांना न्याय मिळाल्याचा आनंद व्यक्त केला जात आहे.

२७ जुलै २०१४ रोजी येळ्ळूरमध्ये ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ असा फलक हटवल्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांवर सात खटले दाखल केले होते. यापूर्वीच्या पाच खटल्यांत सर्व आरोपी निर्दोष ठरले होते. उर्वरित दोन खटल्यांचा निकाल आज जाहीर झाला, त्यातही सर्व आरोपींना निर्दोष मुक्तता मिळाली आहे.

केस नंबर १२२/२०१५ मध्ये अर्जुन गोरल, रमेश घाडी, नंदू कुगजी, मारुती देसाई, पिंटू धामणेकर, बसवंत लोहार, श्रीकांत नांदुडकर, सागर काकतकर, अमित जाधव, मनोहर कुंडेकर, विठ्ठल कुरंगी, शंकर कणबरकर, परशुराम कंग्राळकर, अनंत कंग्राळकर, शिवाजी जाधव, प्रशांत कुगाजी, अर्जुन चौगुले, प्रशांत टक्केकर, परशुराम धामणेकर, अनंत कुंडेकर, मधु कुगजी, कृष्णा काकतकर, अशोक धामणेकर, तानाजी हलगेकर, मारुती गोरल, चांगप्पा हलगेकर, अरविंद पाटील, नारायण काकतकर, शामला जाधव, सुधा जाधव, मलन जाधव, कमल पोटे, जयश्री खादरवाडकर, रामचंद्र बागेवाडी, विकास पाटील, सुनील पाटील आणि सतीश कुगजी यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. या केसमध्ये सतत गैरहजर राहिलेल्या प्रवीण धामणेकर यांचे नाव केस मधून वगळण्यात आले आहे.

केस नंबर १२६ मध्ये आज १९ आरोपी हजर होते आणि त्यांची जबाब नोंदवण्यात आली. या खटल्यांतही सर्व आरोपींना निर्दोष मुक्तता मिळाली आहे. वारंवार गैरहजर राहिलेल्या पाच आरोपींना केस मधून वगळण्यात आले. यापूर्वी सूरज नायकोजी, सतीश जाधव, नारायण कंग्राळकर, अनंत पाटील, संजय गोरल आणि प्रशांत जाधव या सहा जणांची नावे वगळण्यात आली होती. दुर्दैवाने या प्रदीर्घ लढाईत अरुण यळ्ळूरकर, बाळू मजुकर आणि शिवाजी काकतकर या तिघांचे निधन झाले आहे.

या प्रकरणी ॲड. शामसुंदर पत्तार, ॲड. शाम पाटील आणि ॲड. हेमराज बेंचन्नवर यांनी काम पाहिले.