- राज्यपाल थावरचंद गेहलोत
बेळगाव / प्रतिनिधी
तांत्रिक विकास हा राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. भारतरत्न सर एम. विश्वेश्वरैया यांच्या पावलावर पाऊल ठेवून विद्यार्थ्यांनी नवनवीन शोध आणि राष्ट्रसेवेत स्वतःला झोकून द्यावे, असे आवाहन कुलपती तथा राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी केले. बेळगाव येथील विश्वेश्वरैया तांत्रिक विद्यापीठाच्या ज्ञान संगम परिसरात वार्षिक दीक्षांत समारंभ अत्यंत उत्साहात संपन्न झाला. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात पात्र विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आणि संशोधन पदव्या प्रदान करण्यात आल्या. यावेळी बोलताना राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी तांत्रिक विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, “व्यावसायिक अनुभव, सैद्धांतिक ज्ञान आणि तांत्रिक कौशल्ये यांसोबतच नाविन्यपूर्ण संशोधनाची आज मोठी गरज आहे. सर एम. विश्वेश्वरैया यांचे जीवन आपल्याला तांत्रिक शोध आणि राष्ट्रसेवेच्या माध्यमातून प्रगतीचा मार्ग दाखवते. पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षक आणि पालकांचे मोठे कष्ट आहेत.” व्हीटीयूमध्ये मिळालेले शिक्षण विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी नौदल तळाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग रिअर ॲडमिरल विक्रम मेनन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आजच्या युगात नवनवीन आव्हाने आणि बदल समोर येत आहेत, त्यांचा सामना करून ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करा. अभियंत्यांनी आधुनिक अभियांत्रिकीचे परिणाम समजून घेऊन उपलब्ध संधींचा फायदा घ्यावा, असे त्यांनी म्हटले. उच्च शिक्षण मंत्री डॉ. एम. सी. सुधाकर यांनी पदवीधरांचे अभिनंदन करत मोठी घोषणा केली. लवकरच कर्नाटक सरकारकडून इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ६०० आणि पॉलिटेक्निकमध्ये ९४१ अशी एकूण सुमारे २ हजार पदे भरली जाणार आहेत. पदवीधरांनी शिक्षण क्षेत्रातील बदलाचे वाहक व्हावे आणि विद्यापीठात मिळालेल्या कौशल्यांचा योग्य वेळी वापर करावा, असे आवाहन डॉ. एम. सी. सुधाकर यांनी केले. या दीक्षांत समारंभाला कुलगुरू प्रो. विद्याशंकर एस., कुलसचिव प्रो. प्रसाद बी. रामपूरे, कुलसचिव (मूल्यमापन) प्रो. बी. ई. उज्वल आणि कार्यकारी परिषदेचे सदस्य उपस्थित होते. या सोहळ्यात शिमोगा येथील संचिता या विद्यार्थिनीने ४ सुवर्णपदके पटकावून विशेष यश संपादन केले. तिचे वडील शेतकरी असून आई अभियंता आहे. संचिताने आपले यश शिक्षक, मार्गदर्शक आणि पालकांना समर्पित केले. सत्याने आणि धर्माने वागून एक आदर्श नागरिक म्हणून जीवन जगण्याचा संकल्प तिने यावेळी व्यक्त केला.








