नवी दिल्ली : भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या एका पत्रात आरोग्यासंबंधी कारणे आणि उपचार घेण्याच्या सल्ल्याचा हवाला देत, संविधानाच्या कलम ६७(अ) अंतर्गत त्यांच्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. दरम्यान धनखड यांनी या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचेही सहकार्य केल्याबद्दल आभार मानले आहेत.

राष्ट्रपती मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात जगदीप धनखड म्हणाले आहेत की, आरोग्याला प्राधान्य आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करत मी भारताच्या उपराष्ट्रापती पदाचा संविधानाच्या ६७ (अ) कलमानुसार तात्काळ प्रभावाने राजीनामा देत आहे.

या पत्रात, धनखड यांनी पुढे त्यांच्या कार्यकाळात त्यांना मिळालेला पाठिंबा आणि सौहार्दपूर्ण संबंधांसाठी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे आभार मानले आणि त्यांचा पाठिंबा अमूल्य असल्याचे म्हटले आहे. तसेच आपल्या कार्यकाळादरम्यान त्यांच्याकडून खूप काही शिकल्याचेही धनखड यावेळी म्हणाले.

“संसदेतील सर्व सदस्यांकडून जे प्रेम, विश्वास आणि सन्मान मिळाला तो माझ्या आठवणी जन्मभर राहिल. मी या महान लोकशाहीसाठी आभारी आहे, मला या महान लोकशाहीत उपराष्ट्रपती म्हणून मिळालेले अनुभव आणि ज्ञान हे इकृतज्ञता अत्यंत मौल्यवान होते. ही माझ्यासाठी सौभाग्य आणि समाधानाची गोष्ट आहे की मी भारताची अभूतपूर्व आर्थिक प्रगती आणि परिवर्तनकारी काळातील वेगाने होणारा विकास पाहिला आणि त्यामध्ये माझं योगदान दिले. या महत्त्वपूर्ण काळात सेवा करणे माझासाठी खरी सन्मानाची बाब आहे. आज मी हे पद सोडत आहे तेव्हा माझ्या मनात भारताचे यश आणि उज्वल भविष्यासाठी अभिमान आणि अतूट विश्वास आहे,” असे धनखड त्यांच्या पत्रात म्हणाले आहेत.

२०१४ मध्ये धनखड यांनी देशाचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. ६ ऑगस्ट २०२२ रोजी उपराष्ट्रपती पदाची निवड झाली होती. यावेळी विरोधी पक्षाचा उमेदवार मारिट अल्वा या होत्या, ज्यांना धनखड यांनी पराभूत केले. धनखड यांना ७२५ पैकी ५२८ मते मिळाली होती. तर विरोधी पक्षाच्या उमेदवाराला १८२ मते मिळाली होती.