- दुबईतील एकतर्फी सामन्यात पाकिस्तानचा ७ विकेट्सने धुव्वा
- सूर्यकुमार – अभिषेकची आक्रमक खेळी
दुबई : टीम इंडियाने आशिया कप २०२५ स्पर्धेत सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात सलग दुसरा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने यूएईनंतर आज रविवारी १४ सप्टेंबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. पाकिस्तानने टीम इंडियाला विजयासाठी १२८ धावांचे आव्हान दिले होते. भारताने हे आव्हान तीन विकेट्स गमावून पूर्ण केले. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या दोघांनी भारताच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली.
भारताच्या गोलंदाजांनी चांगली सुरूवात करत संघाच्या विजयाचा पाया रचला. तर फलंदाजीत आघाडीच्या चार फलंदाजांनी शानदार फलंदाजी करत पाकिस्तानला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. पाकिस्तानने दिलेल्या १२८ धावांचे लक्ष्य भारताने १५.५ षटकांत गाठत ७ विकेट्सने विजय मिळवला.
प्रारंभी नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. भारताच्या गोलंदाजांनी आपल्या भेदक आणि उत्कृष्ट गोलंदाजीच्या बळावर शानदार कामगिरी केली. भारतीय संघाने पहिल्याच षटकात विकेट घेत सामन्याला सुरूवात केली. हार्दिक पंड्याने गोलंदाजीला सुरूवात करत पहिला चेंडू वाईड टाकला आणि त्यानंतर पहिल्या लीगल चेंडूवर त्याने सईम अयुबला झेलबाद करवत पहिली विकेट मिळवली. सईम अयुब सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला. तर बुमराहने पुढच्या षटकात मोहम्मद हारिसला झेलबाद केले
पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहान याने ४० धावांची खेळी केली. याशिवाय इतर फलंदाज फेल ठरले. फरहानसह फखर जमानने भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला, पण भारताच्या फिरकीपटूंपुढे कोणाच निभाव लागला नाही. अक्षर पटेलने झटपट दोन विकेट घेतले. कुलदीपच्या फिरकीने पुन्हा एकदा आपली जादू दाखवली. त्याने सलग दोन विकेट्स घेत पाकिस्तानला धक्के दिले.
गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी वादळी फटकेबाजी करत ३३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.आफ्रिदीने १६ चेंडूत ४ षटकारांसह ३३ धावा केल्या. तर सुफियान मुकीमने बुमराहविरूद्ध दोन चौकार मारले. पण बुमराहने त्याला क्लीन बोल्ड करत लगेच बदला घेतला. भारताकडून कुलदीपने ३ विकेट्स, अक्षर व बुमराहने २-२ विकेट्स तर हार्दिक व वरूणने १-१ विकेट्स घेतल्या.
पाकिस्तानने दिलेल्या १२८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अभिषेक शर्माने पहिल्या दोन चेंडूवर चौकार, षटकार लगावत दणक्यात सुरूवात केली. अभिषेक शर्मा १३ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ३१ धावा करत बाद झाला. तर शुबमन गिल २ चौकार लगावत १० धावा करत माघारी परतला. यानंतर तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादवने ५० अधिक धावांची भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. तिलक वर्मा ३१ धावा करत बाद झाला.
सूर्यकुमार यादव कमालीची फटकेबाजी करत संघाच्या विजयाचा हिरो ठरला. सूर्यकुमार यादवने ३७ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह ४७ धावा करत नाबाद माघारी परतला. भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने विजयी षटकार लगावला. सूर्यकुमार यादवचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी त्याने भारताच्या चाहत्यांना विजयाचे रिटर्न गिफ्ट दिले आहे.