- अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ९६ धावांनी धुव्वा
अहमदाबाद : येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज टी – २० वर्ल्ड कपच्या २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत विश्वचषकावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे, टीम इंडियाने सलग दोन टी-२० वर्ल्ड कप जिंकणारा पहिला संघ बनण्याचा मान मिळवला आहे. न्यूझीलंडसमोर २५६ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर भारतीय गोलंदाजांनीही कमाल दाखवत किवी संघाचा पराभव केला.
जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांच्या घातक माऱ्यासमोर न्यूझीलंडचा डाव १५९ धावांवरच आटोपला आणि भारताने ९६ धावांनी दणदणीत विजय मिळवत तिसऱ्यांदा टी-२०विश्वचषक पटकावले. हा केवळ विजय नव्हता, तर भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा अभिमानाचा क्षण होता.
न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतातर्फे सलामीच्या संजू सॅमसनने सलग तिसऱ्या सामन्यात झळकावलेले वेगवान अर्धशतक भारताच्या या डावाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. त्याने ४६ चेंडूत पाच चौकार आणि आठ षटकारांसह ८९ धावांची खेळी उभारली. संजू सॅमसननं अभिषेक शर्मा समवेत पहिल्या विकेटसाठी ९८ धावांची आणि ईशान किशनच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी केली.
संपूर्ण स्पर्धेत धावांसाठी झगडणाऱ्या अभिषेक शर्माने सावध सुरुवात केली. संजूने मॉट हेन्रीच्या पहिल्याच षटकात खणखणीत षटकार लगावत इरादे स्पष्ट केले. न्यूझीलंडने दुसरे षटक फिरकीपटू ग्लेन फिलीप्सला दिले. या स्पर्धेत भारतीय फलंदाज सातत्याने फिरकीपटूंना बाद होत असल्याचे आकडे सांगत होते. त्यामुळे संजू-अभिशेकने फिलीप्सविरुद्ध धोका पत्करला नाही. स्पर्धेतला केवळ दुसराच सामना खेळणाऱ्या जेकब डफीच्या पहिल्या षटकात अभिषेकने दोन तर संजूने एक चौकार लगावला. या षटकाने दोघांना खेळपट्टीचा अंदाज आला. लॉकी फर्ग्युसनचा वेग या दोघांना अडचणीत आणेल अशी चिन्हे होती. मात्र अत्यंत स्वैर गोलंदाजी करणाऱ्या लॉकीच्या गोलंदाजीवर या जोडीने जोरदार आक्रमण केले. फर्ग्युसनच्या पहिल्याच षटकात या दोघांनी २४ धावा वसूल केल्या. हेन्रीच्या पुढच्या षटकात दोघांनी २१ धावा चोपून काढल्या. पॉवरप्लेचे शेवटचे षटक डफीला देण्याचा सँटनरचा निर्णय पूर्णत: चुकला. या दोघांच्या आक्रणमासमोर डफीची लय हरपली. क्षेत्ररक्षणाचे निर्बंध असणाऱ्या या षटकात संजू-अभिषेक जोडीने २० धावा कुटल्या. पॉवरप्लेच्या ६ षटकात ९२ धावांची सलामी देत या जोडीने जणू विजयाचा पाया रचला. याच षटकात अभिषेकने अवघ्या १८ चेंडूत अर्धशतकाला गवसणी घातली.
पॉवरप्ले संपताच संजू-अभिषेक जोडीचा वेग काहीसा मंदावला. रचीन रवींद्रने अभिषेकला बाद केले. टीम सैफर्टने अतिशय सुरेख झेल टिपला. अभिषेकने २१ चेंडूत ५२ धावांची वादळी खेळी साकारली. इशान किशनने अभिषेकचाच कित्ता गिरवत खेळपट्टीवर दाखल झाल्यापासून चौकार-षटकारांना सुरुवात केली. संजू- इशान जोडीने पॉवरप्ले संपल्यानंतरही चौकार- षटकारांची लयलूट कायम राखत भारतीय संघ मोठी धावसंख्या रचेल याची काळजी घेतली. १० षटकात भारतीय संघाने १२७ धावा पटावर नोंदवल्या. वेस्ट इंडिज आणि इंग्लंडविरुद्धचा झंझावाती फॉर्म कायम राखत संजूने सँटनरच्या चेंडूवर एक धाव घेत अर्धशतक पूर्ण केले. फर्ग्युसनला लक्ष्य करत संजू-ईशान जोडीने २४ धावा लुटल्या. रचीन रवींद्रच्या षटकात संजूने षटकारांची हॅट्रिक केली. या भागीदारीच्या बळावरच भारतीय संघाने टी२० वर्ल्डकप फायनलमध्ये सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम मागे टाकला.
शतकाकडे वेगवान वाटचाल करणाऱ्या संजूला जेमी नीशामने रोखले. लॉना ऑनच्या डोक्यावर षटकार लगावण्याचा संजूचा प्रयत्न बदली खेळाडू मॅकहोनीच्या हातात जाऊन विसावला. संजूने फायनलसारख्या दडपणाच्या सामन्यात ४६ चेंडूत ५ चौकार आणि ८ षटकारांसह ८९ धावांची तडाखेबंद खेळी साकारली. धावसंख्या वाढवण्याच्या नादात याच षटकात ईशाननेही आपली विकेट गमावली. त्याने २५ चेंडूत ५४ धावांची वेगवान खेळी केली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ४८ चेंडूत १०५ धावांची अतिवेगवान भागीदारी साकारली. खेळपट्टीवर आल्या आल्या सुपला फटका खेळायचा सूर्यकुमार यादवचा प्रयत्न रवींद्रने सफल होऊ दिला नाही. कर्णधार सूर्याला महत्त्वपूर्ण लढतीत भोपळाही फोडता आला नाही. हार्दिक पंड्या १८ धावा करून तंबूत परतला. शेवटच्या षटकात २४ धावा चोपून काढत भारतीय संघाने २५५ धावांचा डोंगर उभारला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३३ चेंडूत शतक झळकावणाऱ्या फिन ॲलनला अक्षर पटेलने बाद करत न्यूझीलंडला पहिला दणका दिला.ॲलनकडून न्यूझीलंडला मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र तिसऱ्याच षटकात अक्षरने त्याची खेळी संपुष्टात आणली. पुढच्याच षटकात जसप्रीत बुमराहच्या स्लोअरवन चेंडूवर रचीन रवींद्र फसला. अक्षर पटेलच्या फिरकीचे कोडे ग्लेन फिलीप्स सोडवू शकला आणि त्रिफळाचीत झाला. हार्दिक पंड्याचा ऑफस्टंपबाहेरचा चेंडू मारायच्या प्रयत्नाच चेंडू स्टंप्सवर आदळला. अर्धशतक पूर्ण केलेल्या वरुण चक्रवर्तीने बाद केले. जसप्रीत बुमराहने अवघ्या १५ धावा देत न्यूझीलंडच्या चार फलंदाजांना माघारी धाडले.
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फिरकीपटू अक्षर पटेल यांनी अचूक आणि घातक गोलंदाजी करत किवी फलंदाजांना जखडून ठेवले. नियमित अंतराने विकेट्स घेत भारताने सामन्यावर पकड मजबूत केली. दबावाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंडच्या फलंदाजांना मोठी भागीदारी करता आली नाही. परिणामी संपूर्ण संघ १५९ धावांवर मर्यादित राहिला आणि भारताने हा सामना ९६ धावांनी जिंकला.








