- घातपाताचा संशय
खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील तिनेघाटाजवळील बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तिनेघाट परेड रोड क्रॉसिंगजवळ पुलाखाली पाण्यात एका महिलेचा मृतदेह आढळला. मृत महिलेची ओळख पटली असून अश्विनी बाबुराव पाटील (वय ५० रा. नंदगड दुर्गानगर, ता. खानापूर) असे तिचे नाव आहे. ती अंगणवाडी सेविका होती.
घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह पाण्याबाहेर काढला. प्राथमिक तपासणीत महिलेच्या चेहऱ्यावर व डोक्यावर गंभीर जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, अश्विनी पाटील दि. २ ऑक्टोबर रोजी कक्केरी यात्रेसाठी टेम्पोने स्वतःच्या गावी निघाल्या होत्या. यात्रा पूर्ण झाल्यानंतर त्या परत येत असताना बिडीमध्ये काम असल्याचे सांगून त्या टेम्पोतून उतरल्या; मात्र नंतर त्या घरी परतल्या नाहीत. रात्री उशिरापर्यंत त्यांच्याशी संपर्क साधता न आल्यामुळे त्यांच्या मुलाने नंदगड पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली.
पोलीस तपासणीत त्यांच्या मोबाईल फोनवर दोन संदेश सापडले. त्यापैकी एकात “मी आत्महत्या करत आहे” असा मजकूर होता, तर दुसऱ्यात “मी बंगळुरूला जात आहे” असे लिहिलेले होते. यामुळे मृत्यू खून आहे की आत्महत्या, याबाबत गोंधळ निर्माण झाला आहे.
सध्या रामनगर पोलिस या घटनेचा सखोल तपास करत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.