बेळगाव / प्रतिनिधी
येळ्ळूर गाव हे इतिहास घडवणारे गाव असून, स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच येथे शिक्षणावर भर देण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली. येळ्ळूर गावातील शासकीय मराठी मॉडेल शाळेच्या शतक महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आज बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर गावातील सरकारी मराठी मॉडेल शाळेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित सोहळ्यात माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर राज्याच्या महिला व बालविकास खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, के. एल.ई. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार अरविंद पाटील, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ आदी मान्यवर उपस्थित होते.
समारंभाचे उद्घाटन केल्यानंतर बोलताना शरद पवार म्हणाले की, १५० वर्षे ग्रामीण भागात शिक्षण सेवा देणे ही सामान्य बाब नाही. येथे शिकलेली मुले देश-विदेशात आपली छाप पाडत आहेत, आणि येळ्ळूरचा गौरव वाढवत आहेत. हे सर्व येथे कार्यरत शिक्षकांच्या अथक परिश्रमामुळे शक्य झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांचे राज्य आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केले. तेथे सर्वाना समान हक्क दिले गेले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन, सर्वांना शिक्षणाचा हक्क मिळावा, हीच खरी भावना आहे. येळ्ळूर ही लढवय्यांची भूमी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून येथे शैक्षणिक क्रांती सुरूच आहे. त्या काळी अक्षरदायिनी सावित्रीबाई फुले यांनी सहन केलेल्या संघर्षामुळे आज महिला शिक्षकांना शिक्षण सेवेसाठी संधी मिळत आहे, असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, ग्रामीण भागातील प्रत्येकाच्या मनात बारामती बसली आहे. पक्षभेद विसरून बेळगावच्या विकासासाठी सर्वांनी नेहमीच तयार राहायला हवे, असे मत त्यांनी मांडले.
यावेळी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. रावजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या समारंभास स्वागताध्यक्ष म्हणून एन. डी. गोरे हे लाभले होते. तर अध्यक्षपदी सतीश पाटील हे उपस्थित होते. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रकाश मरगाळे, रमाकांत कोंड्रस्कर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.