• इदलहोंड येथील घटना

खानापूर / प्रतिनिधी

विद्युतभारीत तारेच्या स्पर्शाने ९ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. खानापूर तालुक्यातील इदलहोंड येथे बुधवार (दि. २) एप्रिल रोजी सायंकाळी ५ .४५ वा. ही घटना घडली. मनाली मारुती चोपडे (वय ९) असे मृत मुलीचे नाव आहे.

इदलहोंड आणि सिंगिनकोपला लागून असलेल्या गावांजवळ मारुती चोपडे यांचे घर आहे. त्यांच्या घराशेजारील वीटभट्टी मालकाने विटा तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात माती साठवली होती. या मातीच्या ढिगाऱ्यावरूनच विद्युत तारा गेल्या आहेत.

बुधवारी सायंकाळी मनाली इतर चार मुलांसह या ढिगाऱ्यावर खेळत होती. खेळताना तिचा तोल गेल्याने तिने आधारासाठी वीज तार पकडली आणि तिला विजेचा मोठा धक्का बसला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. तर एक लहान मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर खानापूरच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेबाबत हेस्कॉम अधिकाऱ्यांनी सांगितले की, वीटभट्टी मालकाला मातीचा ढीग हटविण्याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्याने दुर्लक्ष केल्यामुळे हा दुर्दैवी प्रकार घडला. दरम्यान, वीटभट्टी मालक घटना घडल्यानंतर फरार झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.