• शहरातील अनुचित कृत्यांना आळा घालण्याची मागणी

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरातील विविध ठिकाणी एका समुदायातील तरुणांकडून होत असलेल्या अनुचित कृत्यांना आळा घालण्यासाठी ठोस कारवाई करण्याची मागणी करत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आज पोलिस आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी या मागणीचे निवेदन पोलीस आयुक्तांना देण्यात आले. पांगुळ गल्ली येथील अश्वत्थामा मंदिरावर एका समुदायातील तरुणाने केलेल्या दगडफेकीच्या घटनेचा निषेध करीत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी एका नेत्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.

दरबार गल्ली येथे एका स्क्रीनवर औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचे शौर्यत्व सार्वजनिकरित्या प्रदर्शित करून त्यांनी आपला उद्धटपणा सादर केला आहे. असे करून त्यांनी संभाजी महाराजांचा अपमान केला आहे. केदनूर येथील महादेव मंदिरानजीक त्या गटाकडून मास सेवन करणे यासह अनैतिक प्रकार केले जात आहेत, ते प्रकार थांबवावेत.

बेळगाव जिल्ह्यात गांजाच्या नशेत गैरप्रकार केले जात आहेत. एका गटातील तरुणांकडून होणारे हे गैरप्रकार थांबवण्यासाठी आणि शांतता राखण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्याचे आवाहन आम्ही पोलिस आयुक्तांना करत आहोत. जर ठोस कारवाई झाली नाही तर तीव्र लढा उभारला जाईल, असा इशारा बजरंग दलाचे कार्यकर्ते सुनील गौरन्नवर यांनी दिला आहे.

काही लोकांविरुद्ध आधीच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच विविध ठिकाणी पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. अनुचित घटना घडू नयेत यासाठी ठोस क्रम हाती घेण्यात आले आहेत. भविष्यात शांतता भंग करणाऱ्याची गय केली जाणार नाही. कोणत्याही अनुचित घटना आढळल्यास त्वरित आपल्याला कळवावे, त्वरित कारवाई केली जाईल, असे पोलीस आयुक्त ईडा मार्टिन म्हणाले. यावेळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.