-
विजयपूरमधील घटना
-
मुलींची दहावी परीक्षा ; बेतली पित्याच्या जीवावर
विजापूर / दिपक शिंत्रे
सध्या राज्यात दहावी परीक्षा सुरु असून विद्यार्थ्यांपेक्षा पालकांनाच परीक्षेची अधिक चिंता आहे. पाल्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत सोडण्यासह परत आणण्याचे काम पालकांना करावे लागत आहे. मात्र, वेळेत केंद्रावर सोडण्यासाठी केलेली घाई जीवावरही बेतत आहे. दोन मुलींना दहावी परीक्षा केंद्रावर दुचाकीवरुन घेऊन चाललेल्या अशाच एका पित्याचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला. तर त्यांच्या दोन मुलींसह तीन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या. विजापूर जिल्ह्यातील कागोळजवळ सोमवारी (दि. २४) सकाळी हा अपघात झाला. व्यंकू चव्हाण (वय ४३, रा. कुमटगी तांडा, ता. विजापूर) असे मृताचे नाव आहे. तर त्यांची मुलगी ऐश्वर्या चव्हाण, प्रिती चव्हाण व शेजाऱ्यांची मुलगी श्वेता अशी जखमींची नावे आहेत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, व्यंकू चव्हाण यांच्या मुली ऐश्वर्या व प्रिती यांच्यासह शेजाऱ्यांची मुलगी श्वेता दहावीला असून त्यांची परीक्षा कग्गोड केंद्रावर सुरु आहे. त्यांचा सोमवारी गणिताचा पेपर होता. त्यामुळे, व्यंकू या तिघींना आपल्या दुचाकीवरुन (केए २८ एचएल ५६०३) घेऊन राष्ट्रीय महामार्ग क्र. ५२ वरुन कग्गोडला चालले होते. कग्गोडजवळ आले असता तेलंगणावरुन आलेल्या ट्रकने (टीएस १५ यूए ८०५५) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की व्यंकू जागीच ठार झाले. तर तिन्ही मुली गंभीर जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच विजापूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. जखमी मुलींना शहरातील बीएलडीई संस्थेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. विजापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. मुलींना दहावी परीक्षेला सोडण्यासाठी चाललेल्या पित्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
-
पालकमंत्र्यांकडून विचारपूस
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पालकमंत्री डॉ. एम. बी. पाटील यांनी बीएलडीई रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी तिन्ही जखमी विद्यार्थिनींची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. तसेच डॉक्टरांकडून त्यांच्या तब्येतीबद्दल माहिती घेऊन त्यांच्यावर चांगले उपचार करण्याच्या सूचना केल्या.