नवी दिल्ली : मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला लवकरच भारतात आणण्याची शक्यता आहे. या प्रकरणात भारताला मोठं यश मिळालं आहे. यासाठी भारतातील अनेक तपास यंत्रणाची पथके अमेरिकेत हजर आहेत. तहव्वूर राणावर २००८ च्या मुंबई हल्ल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात १६६ लोकांचा जीव गेला होता. दीर्घ काळापासून भारत तहव्वूर राणाच्या प्रर्त्यापणाची मागणी करत होता. अखेर मागील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रम्प यांच्या भेटीला गेले असता या दोन्ही नेत्यांच्या बैठकीत अमेरिकेने ही मागणी मान्य केली.

तहव्वूर राणा आयएसआय आणि लष्कर – ए – तोयबाचा सदस्य आहे. राणा हा डेविड हेडलीचा खास मानला जात होता. हल्ल्याअगोदर तहव्वूर आणि हेडली यांची अनेकदा बैठक झाली. डेविड हेडलीने अमेरिकन तपास यंत्रणेसमोर तहव्वूरचं नाव घेतले होते. हेडली मुंबई हल्ल्याआधीच भारतात आला होता. त्याने मुंबईतील ताज हॉटेल, लियोपोल्ड कॅफेसह अन्य प्रमुख जागांची रेकी केली होती. त्यानंतर आयएसआय आणि पाकिस्तानी सैन्याद्वारे प्रशिक्षण दिलेले लष्कर ए तोयबाचे दहशतवादी मुंबईत शिरले आणि त्यांनी ताज हॉटेलसह इतर ठिकाणांवर हल्ले केले.