- जिल्हाधिकाऱ्यांकडून पूर्वतयारी बैठक
- नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळेचे भान ठेवून काम करावे
- जिल्हाधिकाऱ्यांची सूचना ; परीक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक
बेळगाव / प्रतिनिधी
राज्यातील एसएसएलसी परीक्षेला शुक्रवार दि. २१ मार्च पासून सुरुवात होणार असून जिल्ह्यात परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळेचे भान ठेवून काम करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केली. जिल्हा पंचायत सभागृहात मंगळवारी झालेल्या पूर्वतयारी बैठकीच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.

- संवेदनशील परीक्षा केंद्रांभोवती बारकाईने लक्ष ठेवा :
संवेदनशील परीक्षा केंद्रांभोवती सूक्ष्म चाचणी केंद्रांच्या नियुक्त कर्मचाऱ्यांनी सतत लक्ष दिले पाहिजे. संवेदनशील अशी २५ परीक्षा केंद्रे निदर्शनास आली आहेत जिथे गेल्या वर्षी किरकोळ गोंधळ झाला होता. ज्यात सीसीटीव्ही चोरी आणि वादावादीचा समावेश होता असे त्यांनी स्पष्ट केले.
परीक्षा कर्तव्य बजावण्यासाठी नेमलेल्या मुख्याधिकाऱ्यांनी कितीही कठीण परिस्थितीत कोणत्याही गोंधळात न पडता परिश्रमपूर्वक काम केले पाहिजे. पोलीस विभाग अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करेल, असेही जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तळमजल्यावर सुविधा द्याव्यात, असा शासन आदेश आहे. त्यानुसार दिव्यांगांना विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था आगाऊ करण्यात यावी अशी सूचना त्यांनी केली.
- परीक्षा केंद्रांवर आवश्यक वैद्यकीय सेवा:
विद्यार्थी वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचावेत यासाठी परिवहन संस्थेने बसेसची व्यवस्था करावी. बसचे मार्ग आधीच निश्चित करावेत. आरोग्य विभागाने आपत्कालीन सेवा, आवश्यक औषधे आणि कुशल वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी सूचना त्यांनी केली. सर्व तहसीलदारांनी त्यांच्या अखत्यारीतील परीक्षा केंद्रांची सतत तपासणी करावी. प्रश्नपत्रिका फुटणार नाही याची काळजी घ्यावी. परीक्षा केंद्रांची पाहणी करण्यासाठी तालुका आणि जिल्हास्तरावर विशेष पथक नेमण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
- परीक्षेची खबरदारी :
परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरात झेरॉक्स केंद्रे बंद ठेवण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. ६०० हून अधिक उमेदवार आणि निवडलेल्या ३५ परीक्षा केंद्रांना अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्यात येणार आहे. परीक्षांची गोपनीयता आणि पारदर्शकता राखण्यासाठी दक्षता पथकाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

- परीक्षा केंद्राभोवती शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्याच्या सूचना :
जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी सांगितले की, सध्या उन्हाळा असल्याने उन्हाचा तडाखा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व परीक्षा कक्षांमध्ये पिण्याचे पाणी आणि ओआरएस अनिवार्यपणे ठेवावे, तसेच बस वाहतुकीचे मार्ग निश्चित करून वेळेत बसेस मार्गस्थ करण्याचे निर्देश द्यावेत असे ते म्हणाले. परीक्षेदरम्यान काही शहरांमध्ये यात्रा आणि खाजगी कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. असे आढळून आल्यास स्थानिक पोलीस स्थानकाला कळवावे. परीक्षा केंद्रांभोवती कोणताही कार्यक्रम आयोजित करू नये.सर्व विभागांच्या सहकार्याने एसएसएलसी परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी निर्भयपणे परीक्षेचे वातावरण निर्माण करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले पाहिजेत, अशी सूचना त्यांनी केली.

या बैठकीला शहर पोलिस आयुक्त ईडा मार्टिन, डीडीपीआय लीलावती हिरेमठ, चिक्कोडी डीडीपीआय सीतारामू, अन्न व पुरवठा विभागाचे सहसंचालक साखरेप्पागौडा बिरादार, मुख्याध्यापक बसवराज नालतवाड, आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी ईश्वर गडाद उपस्थित होते.