बेळगाव / प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या दहावीच्या परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात झाली विद्यार्थ्यांच्या गर्दीमुळे सकाळपासूनच
परीक्षा केंद्रांची आवारे फुलून आली होती. विद्यार्थ्यांसमवेत पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध ठिकाणी सामाजिक संस्थांच्या वतीने विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. शहरातील १९ केंद्रांवर परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून आले.
विद्यार्थ्यांच्या मनामध्ये थोडी हुरहुर असली तरी परीक्षा देण्यासाठी सर्वच विद्यार्थी सज्ज होऊन आल्याचे मत शिक्षक वर्गाने व्यक्त केले. कर्नाटक शालांत परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ बेंगळूर यांच्या आदेशानुसार दहावी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २०२५ सालची एसएसएलसी परीक्षा तीन टप्प्यात घेण्यात येणार असून पहिल्या टप्प्यातील परीक्षा उद्या शुक्रवार दि. २१ मार्च पासून शुक्रवार दि.४ एप्रिल २०२५ पर्यंत घेतली जाणार आहे, बेळगाव जिल्ह्यातील ९७ आणि चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील १३० अशा एकूण २५७ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा सुरू झाली आहे. बेळगाव जिल्ह्यातील ३७,८६३ आणि चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील ४७,५११ असे एकूण ८२,३७४ विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत.
परीक्षा शांततेत आणि सुरक्षितपणे पार पडावी यासाठी परीक्षा केंद्रांच्या २०० मीटर परिघातील अहितकारक घटना रोखण्यासाठी संचार बंदी असेल. त्याचप्रमाणे परीक्षा केंद्राच्या आसपासची झेरॉक्स दुकाने आणि सायबर सेंटर बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रातील वीज पुरवठ्यात व्यत्यय येणार नाही याची काळजी घेण्याची सूचना हेस्कॉम यंत्रणेला देण्यात आली आहे. परीक्षा केंद्रातील वर्गामध्ये परीक्षार्थीना कॅल्क्युलेटर आणि मोबाईल फोन सोबत घेऊन जाण्यास निर्बंध लादण्यात आले होते. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हा पातळीवर शिक्षण तसेच इतर खात्यांच्या अधिकाऱ्यांची भरारी पथके स्थापना झाली आहेत. कोणत्याही परिस्थितीत अथवा कारणास्तव परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना परीक्षेचे नियोजन करणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून बेळगावातील प्रत्येक परीक्षा केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. ज्या परीक्षा केंद्रांमध्ये ६०० पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत अशा केंद्रासह अतिसंवेदनशील अशा १० परीक्षा केंद्राच्या ठिकाणी जादा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.