चिक्कोडी / वार्ताहर
रंगपंचमीनंतर आंघोळीसाठी विहीरीवर गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. बुधवार दि.(१९ मार्च) रोजी सायंकाळी एकसंबा ही घटना घडली. वेदांत संजू हिरेकोडी (वय ९) आणि मनोज काशिनाथ कल्याणी (वय ८) अशी त्या दुर्दैवी मृत मुलांची नावे आहेत.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, बुधवारी सकाळी रंगपंचमी खेळल्यानंतर वेदांत आणि मनोज घराजवळील शेतातील विहिरीत आंघोळीसाठी गेले होते. उशीर होऊनही दोघेही घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरू केला. दरम्यान, घराजनजीक असलेल्या शेतातील विहीरीजवळ त्यांचे कपडे, चप्पल व बादली आढळून आल्याने दोन्ही मुले विहिरीत पडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. यावेळी गावातील काही व्यक्तींनी शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, सायंकाळी पाच वाजता वेदांत हिरेकोडी याचा मृतदेह सापडला. मात्र मनोज कल्याणी याचा मृतदेह शोधण्यात अपयश आल्याने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सदलगा ग्रामस्थ आणि अग्नीशामक दलाच्या जवानांनी एकत्रितपणे मनोजच्या मृतदेहाचा शोध सुरू केला. सायंकाळी ६.३० वा. मनोजचा मृतदेह हाती लागला.
दोन्ही मुलांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची बातमी समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. दरम्यान एकसंबा येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून दोघांचेही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. यानंतर मनोज कल्याणी यांच्या पार्थिवावर एकसंबा येथे तर वेदांत हिरेकुडे यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी केरूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची नोंद सदलगा पोलीस स्थानकात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.