बेळगाव / प्रतिनिधी
मुस्लिम बांधवांच्या सर्व सणांपैकी एक मोठा सण रमजान ईद अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्ताने रमजानच्या पर्वावर बेळगावची बाजारपेठ सजली असून मुस्लिम बांधवांची खरेदीसाठी लगबग वाढली आहे.
सौंदर्य प्रसाधनांसोबत विविध प्रकारचे सुगंधी अत्तर आणि कपड्यांचा यामध्ये समावेश आहे. सुकामेवा, विदेशी फळे, शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थांचेही बाजारात मोठ्या प्रमाणात स्टॉल उभारण्यात आले आहेत. शहरातील खडेबाजार, दरबार गल्ली, शेट्टी गल्ली, खंजर गल्ली, भेंडी बाजारसह विविध गल्ल्या सजल्या आहेत. सायंकाळ होताच याठिकाणी खरेदीसाठी मोठी गर्दी होताना दिसत आहे.

शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खडेबाजार येथे उभारलेल्या विविध रंगीबेरंगी दुकानांनी परिसराची शोभा वाढवली आहे. विद्युत रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे. सायंकाळी ६ नंतर ही रमजान निमित्त या ठिकाणी मेव्याचे कोल्ड्रिंक हाऊस, चिकन दुकाने मोठ्या संख्येत लागलेली दिसत आहेत.
मुस्लिम बांधव खजूर खाऊन रोजा सोडतात, त्यामुळे खजूरसह गरमागरम अशा मांसाहारी खाद्यपदार्थांची विक्री सध्या तेजीत सुरू आहे. उपवास सोडण्यासाठी चिकनसह इतर नॉनव्हेज पदार्थ उपलब्ध असल्याने खवय्यांना एक प्रकारे पर्वणीच लाभली आहे. दररोज विविध पदार्थांची चव चाखण्याची संधी त्यांना लाभत आहे. विशेष म्हणजे काजू, बदाम व खारीक यासह इतर सुकामेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. खासकरून करून थेट मुंबई येथून आलेले खजूर व दुधापासून बनवलेल्या विविध पदार्थांच्या खरेदीसाठी सर्वाधिक गर्दी पाहायला मिळत आहे.

याशिवाय कपडे, टोप्या, चप्पल व दागिन्यांची ही मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू आहे. महिलांसाठी विशेषतः शृंगारचे साहित्य रंगीबेरंगी बांगड्या, विविध प्रकारचे नेकलेस याची खरेदी सुरू आहे. यामध्ये गोल्ड ज्वेलरीची सर्वाधिक मागणी आहे. याकरिता हैदराबादहून शृंगार साहित्य दाखल झाले आहे. हैद्राबादी कंगन, वेस्टर्न आणि जयपुर कंगनला सर्वाधिक मागणी आहे. बाजारात महाराणीहारची चांगली चलती पाहायला मिळत आहे. सण आणि मेहंदी यांचे नाते वेगळेच आहे. बाजारपेठेत विविध प्रकारचे मेहंदी कोन विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे.
रमजान पूर्वी धान्यासह ईदच्या साहित्याची खरेदी करण्यात येते. मात्र यावर्षी बेळगावच्या उष्णतेचा पारा वाढल्यामुळे खरेदीवर याचा परिणाम होईल अशी विक्रेत्यांना धास्ती होती. पण प्रत्यक्षात चित्र बदलले असून उलाढाल वाढल्याने व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.