बेळगाव / प्रतिनिधी

रामदुर्ग तालुक्यातील वकील विनोद पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत बेळगाव आहिंद वकील संघटनेने आंदोलन केले. हल्लेखोरांना तातडीने अटक न केल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

रामदुर्ग तालुक्यातील चन्नापूर तांडा येथे वकील विनोद पाटील यांच्यावर २० जणांच्या जमावाने प्राणघातक हल्ला केला. त्यांच्या कुटुंबीयांवरही वार करण्यात आले. या हल्ल्यात नऊ जण गंभीर जखमी झाले. या संदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असूनही आरोपी अजूनही मोकाट आहेत, असा आरोप आहिंद वकील संघटनेचे पदाधिकारी ॲड. एन.आर.लातूर यांनी केला.

वकील पाटील यांनी न्यायालयातून स्थगिती आदेश आणला होता. मात्र, विरोधी पक्षाने त्यांच्यावर वारंवार हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलिस अधीक्षकांकडे तक्रार देऊनही कारवाई झाली नाही, असेही लातूर यांनी सांगितले. या हल्ल्यामुळे वकिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आरोपींना लवकरात लवकर अटक करावी आणि वकील पाटील यांच्या कुटुंबाला सुरक्षा पुरवावी, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही वकील संघटनेने दिला.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनात ॲड. एन. आर. लातूर, एस. ए. कांबळे, एल. सी. पूजारी, एस. एस. दळवी, एच. पी. तबिलदार, निंगप्पा मास्ती, चेतन हेडगे, रूपा एन.आदी वकील सहभागी झाले होते.