• कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेची मागणी
  • बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
  • कोबीचे पीक जमिनीवर फेकून व्यक्त केला आक्रोश

बेळगाव / प्रतिनिधी

कोबीसह इतर भाजीपाल्याला योग्य हमीभाव देण्याची मागणी करत कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवारी बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी योग्य हमीभाव न मिळालेले कोबीचे पीक जमिनीवर फेकून शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त केला.

गेल्या तीन -चार महिन्यांपासून भाजीपाल्याचे दर पूर्णपणे घटले आहेत. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. कोबी, फ्लॉवर, नवलकोल यासह इतर पिकांना योग्य दर मिळत नाही. त्यामुळे बेळगाव तालुक्यातील सुमारे ५ हजार एकर क्षेत्रावर पीक घेतलेल्या शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. परिणामी उगवलेल्या पिकावर ट्रॅक्टर चालवावा किंवा मेंढ्या चरवाव्या अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

तेव्हा भाजीपाल्याला योग्य हमीभाव द्यावा. एकरी ४० – ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशा अनेक मागण्यांचे निवेदन सरकारला देऊनही सरकार कारवाई करत नसल्याबद्दल आप्पासाहेब देसाई यांनी नाराजी व्यक्त केली.

यावेळी शेतकरी सुभाष धायगोंडे, मारुती कडेमनी, रमणगौडा पाटील. चंद्रू राजाई, राजू कागणीकर, नामदेव धुडूम, फकिर सदावर आदी उपस्थित होते.