- खानापूर तालुक्याच्या बिडी गावातील घटना
खानापूर / प्रतिनिधी
भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात दोन चिमुकल्या मुलींसह अन्य एक महिला गंभीर झाली. खानापूर तालुक्याच्या बिडी गावात गुरुवार (दि. २०) मार्च रोजी ही घटना घडली. आराध्या रमेश काळे (वय ४), निदा आशिफ शमशेद (वय १०), लक्ष्मी काळे (वय ५०) अशी जखमींची नावे असून सध्या त्यांच्यावर बेळगाव बीम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या हल्ल्यात आराध्याचा संपूर्ण कान तोडला गेला तर निदाच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. गावकऱ्यांनी पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्यासाठी ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी केली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नंदगडच्या जत्रेमुळे तेथील कुत्र्यांना स्थलांतरित केल्याने भटक्या कुत्र्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
या हल्ल्याबाबत माहिती देताना बिडी ग्रामस्थांनी सांगितले की, शाळेतून आल्यानंतर मुले खेळत असताना भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला. ही घटना नंदगड पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली.