- भाजपची मागणी
- बेळगावात राज्य सरकार विरोधात निदर्शने ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव / प्रतिनिधी
केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी परतण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरकार तुष्टीकरणाचे राजकारण करत असून भारतात बेकायदेशीपणे राहत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना तातडीने त्यांच्या देशात पाठवावे, या मागणीसाठी आज बेळगाव येथे भाजपतर्फे राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. तत्पूर्वी आंदोलकांनी शहरातील राणी चन्नम्मा सर्कल येथे ठिय्या मांडून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढला. यावेळी सहिष्णुता शून्य पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडावा अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी माजी आमदार संजय पाटील म्हणाले की, केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवण्याचे आदेश दिलेले असतानाही सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकार याकडे लक्ष देत नाही. ते कोणत्याही पक्षापुरते मर्यादित नाही. हे संपूर्ण देशाला लागू होते. देशावर संकट आले की एकजुटीने लढण्याची आपल्या देशाची परंपरा आहे. मात्र मुख्यमंत्री सिद्धरामय्या तुष्टीकरणाचे राजकारण करत आहेत. राज्य सरकारने राजकारण सोडून आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. तसे न केल्यास तीव्र संघर्ष छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

तर कित्तूरचे माजी आमदार महांतेश दोड्डगौडर म्हणाले की, पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानविरुद्ध बदला घेण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला असून, राज्यात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याचे आदेश देशातील सर्व राज्यांना दिले आहेत. मात्र यात कर्नाटक सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे भाजपच्या संघर्षातून राज्य सरकारला भाग पाडले जात आहे. देशात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना तत्काळ हद्दपार करण्याची मागणी त्यांनी केली.
भाजपचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, माजी आमदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना निवेदन देण्यात आले. यावेळी शहराध्यक्षा गीता सुतार, नगरसेवक हनुमंत कोंगाळी, नगरसेवक राजशेखर डोणी, श्रेयस नाकाडी, मुरुगेंद्रगौडा पाटील, शिल्पा केकरे, महेश मोहिते, महांतेश चिन्नाप्पा गौडा आदींचा सहभाग होता.