बेळगाव / प्रतिनिधी
टिळकवाडी येथील पहिले रेल्वेगेट परिसरातील बॅरिकेड्स दोन दिवसांपूर्वी हटविण्यात आले होते. यामुळे टिळकवाडीतील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत होते. हा आनंद दीर्घकाळ टिकणारा नव्हता. कारण मंगळवारी दुपारनंतर पुन्हा बॅरिकेड्स घालण्यात आल्याने नागरिकांना वळसा घालून प्रवास करावा लागणार आहे. दुसरे रेल्वेगेट उड्डाणपुलाचे काम सुरू होणार असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी रहदारी पोलिसांची चाचपणी सुरू आहे. प्रायोगिक तत्त्वावर पहिले रेल्वेगेट येथील बॅरिकेड्स हटविण्यात आले होते. यामुळे नागरिकांना ये-जा करणे सोयीचे ठरले. परंतु, मंगळवारी पुन्हा बॅरिकेड्स घालण्यात आल्याने नागरिकांचा हिरमोड झाला आहे. या ठिकाणचे बॅरिकेड्स कायमस्वरुपी हटवावेत, अशी मागणी होत आहे.