- दहशतवाद्यांवर कारवाईच्या मागणीसाठी शहरात आंदोलन
- जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारला निवेदने सादर
बेळगाव / प्रतिनिधी
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवार (दि.२२) रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २८ जणांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी हल्ल्यानंतर अनेकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या झाडल्या. यामध्ये दहशतवाद्यांनी फक्त हिंदूंना लक्ष्य केले. दरम्यान या घटनेनंतर संपूर्ण देशभरासह बेळगावातही याचे तीव्र पडसाद उमटत असून बुधवारी विविध हिंदुत्ववादी संघटनांनी दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या हिंदूंच्या हत्येच्या निषेधार्थ शहरात आंदोलन केले. यावेळी भ्याड हल्ला करून निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांवर कठोर करण्याची मागणी करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारला उपरोक्त मागणीची निवेदने सादर करण्यात आली.
- श्रीराम सेना हिंदुस्थानचे आंदोलन :
पहलगाममध्ये झालेल्या हिंदूंच्या हत्येला विरोध दर्शवत बुधवारी बेळगावात श्रीराम सेना हिंदुस्थानने निषेध रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारला निवेदन सादर केले.
यावेळी श्रीराम सेना हिंदुस्थानचे संस्थापक रमाकांत कोंडुसकर म्हणाले, पहलगाम मध्ये हिंदू धर्माच्या नागरिकांना लक्ष्य करत हल्ले केले गेले. पंतप्रधान मोदी देशात शांती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असताना, हिंदूंच्या रक्षणात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. त्यांनी पंतप्रधान मोदी तसेच केंद्र सरकारकडे या कृत्यामध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या आंदोलनात श्रीरामसेना हिंदुस्थानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
- श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून काश्मीरमधील हिंदूंच्या हत्येचा निषेध : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
काश्मीरच्या पहलगाम भागात घडलेल्या हिंदू नागरिकांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कडून बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारला निवेदन सादर केले. या निवेदनात काश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या हिंदूंच्या हत्येचा तीव्र निषेध करण्यात आला असून, भारताच्या नियंत्रणा बाहेर असलेल्या पाकव्याप्त काश्मीरचा (पीओके) भारतात समावेश करून कठोर पावले उचलावी तशी मागणी करण्यात आली.
यावेळी संघटनेचे प्रमुख किरण गावडे यांनी काश्मीरसह पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर सातत्याने अत्याचार होत आहेत. अनेकांची हत्या झाली आहे. काहींना घरदार गमवावे लागले आहे. मुंबईत जैन मंदिर जमीनदोस्त करण्यात आले. हे सगळे रोखण्यासाठी केंद्र सरकारने कडक उपाययोजना राबवण्याची मागणी त्यांनी केली.या आंदोलनात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते.
- काश्मीरमध्ये हिंदू भाविकांची हत्या : बेळगावमध्ये श्रीराम सेनेकडून तीव्र निषेध
काश्मीरमधील पहलगाम भागात हिंदू पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करू श्रीराम सेनेने बुधवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय समोर तीव्र आंदोलन केले.
या आंदोलनावेळी केंद्र सरकारकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करून, या दहशतवादी घटनेत सामील असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी श्रीराम सेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.